मुंबई: “खुर्ची जाण्याची वेळ आली तेव्हा यांना औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा निर्णय सुचला. त्यावेळीही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने गप्प बसणे संतापदायक आहे,” अशी टीका ‘एमआयएम’चे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. “सत्ता जातानाच शिवसेनेने औरंगाबादच्या नामांतराचा निर्णय घेतला,” अशा शब्दांत खा. इम्तियाज जलील यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.
संभाजीनगरमध्ये मंगळवारी खा. इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात विविध सामाजिक, राजकीय संघटनांनी औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करण्याच्या निर्णयाच्या विरोधात मोर्चा काढला होता. हजारोंच्या संख्येने मुस्लीम आणि सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्ते या मोर्चात हजर होते. “आमच्यासोबत जे आलेत, त्यांचे स्वागत आणि जे नाही आलेत, त्यांनाही मी पाहून घेईन,” असा इशाराही इम्तियाज जलील यांनी दिला.
“औरंगाबादवर एवढेच प्रेम असेल, तर आधी हे शहर आंतरराष्ट्रीय दर्जाचे करा, मग आम्ही स्वतः संभाजीनगरच्या नावाचा प्रस्ताव घेऊन येऊ,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“औरंगाबादच्या नावाचा निर्णय या शहरातील जनतेला घेऊ द्या,” अशी मागणी खा. जलील यांनी केली आहे. यासाठी मतदान घेतले जावे, या मागणीचा नामांतरविरोधी समितीच्या नेतृत्वात काढलेल्या मोर्चातही जलील यांनी पुनरुच्चार केला. ते म्हणाले की, “हा देश डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसार चालेल. तुमची सत्ता आहे म्हणून तुम्ही जो निर्णय घ्याल, तो जनतेला मान्य करावा लागेल असे तुम्हाला वाटत असेल, तर या लोकांचे प्रश्न आधी समजून घ्या. काही निर्णय घ्यायचा असेल, तर औरंगाबादची जनता घेईल. आमच्यावर निर्णय लादू नका,” असेही खा. जलील यावेळी म्हणाले.