निष्पापांच्या रक्ताने शिवसैनिकांचे हात रंगलेले!

बईतील बेकायदेशीर बांधकाम प्रकरणी आ. नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

    18-Jun-2022
Total Views |

NR
 
 
 
 
 
मुंबई : “मुंबईबाहेरील लोकांच्या मतांच्या लोभाने अनधिकृत बांधकामांना तुमचेच नगरसेवक परवानगी देत आहेत,” असा आरोप करत भाजप आमदार नितेश राणे यांनी अनधिकृत बांधकामे कोसळून होत असलेल्या दुर्घटनांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना शुक्रवारी खरमरीत पत्र लिहिले आहे. तसेच, निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत,” असे म्हणत शिवसेनेवर जोरदार प्रहार केला आहे.
 
 
 
मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या आपल्या पत्रात आ. नितेश राणे म्हणतात की, “सिंहासनावर आंधळा धृतराष्ट्र बसला असेल, तर कौरवांच्या मनमर्जीने राज्य चालते. सध्याची मुंबईची अवस्था पाहता, कुणीही अस्वस्थ होऊ शकतो. गुन्हेगारीचे साम्राज्य, भ्रष्टाचाराची दलदल वाढत वाढत आता सामान्य मुंबईकरांच्या उंबर्‍यापर्यंत पोहोचली आहे. तुम्हीदेखील मुंबईचे रहिवासी असल्याने ढिसाळ कारभाराची राड तुमचा उंबरा एक ना एक दिवस ओलांडणारच होती.”
 
 
 
पुढे राणे आपल्या पत्रात म्हणतात की, “गुरुवार, दि. ९ जूनला तुमच्या निवासस्थानाहून हाकेच्या अंतरावर असलेल्या वांद्रे पश्चिमेमधील शास्त्रीनगरमध्ये बेकायदेशीर बांधकाम कोसळले. त्यातील १७ जण जीवन-मरणाशी लढा देत आहेत. तसेच ४० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. त्या कुटुंबाने फोडलेल्या आक्रोशामुळे सबंध मुंबईच्या काळाजाचा थरकाप उडाला. आपण मात्र तिथे भेट देऊन साधी विचारपूस करण्याची तसदीही घेतली नाही. तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहे का की, त्या निष्पापांच्या रक्ताने तुमच्याच सत्ताधारी शिवसैनिकांचे हात रंगले आहेत!”
 
 
 
अनधिकृत बांधकामांवरुन शिवसेनेवर शरसंधान साधताना पत्रात आ. नितेश राणे म्हणतात की, “वर्षभरापूर्वी मालाड-मालवणीमध्ये घराचे वाढीव अनधिकृत बांधकाम ढासळून ११ जणांचा बळी गेला. मानखुर्दमध्येही असेच प्रकरण घडले. या जळत्या चितांचा प्रकाशही तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचत नाही का? अनधिकृत बांधकामांवर कारवाई करताना कुणाचीही गय करू नका, असे आपले आदेश असतानाही आपले आयुक्त कारवाई करत नाही. अनधिकृत बांधकामांना दिली जाणारी परवानगी जीवघेणी ठरत आहे. राजकीय आकसापायी विरोधकांना अनधिकृत बांधकामांच्या नोटिसी पाठवण्यात दाखवली जाणारी तत्परता, अनधिकृत बांधकामांवर हातोडा चालवण्यातही दाखवावी; अन्यथा मुख्यमंत्री जनतेचे नसून ठरावीक पक्षांच्या पदाधिकारी, नगरसेवकांसाठी आहेत की काय, असा संदेश जनमानसात दृढ होईल.”
 
 
 
शिवसेनेचेच नगरसेवक मतांच्या लालसेपोटी अनधिकृत बांधकामांना परवानगी देतात
 
शिवसेनेला फटकारताना आ. नितेश राणे पत्रात म्हणतात की, “सत्तेची लालसा अधिक मतांची लालसा जीवघेणी ठरते आहे. मुंबईबाहेरील लोकांच्या मतांच्या लोभात अनधिकृत बांधकामांना तुमचे नगरसेवक परवानगी देत आहेत. मुंबईत १४ फुटांच्यावर वाढीव बांधकाम करण्यास बंदी आहे. मात्र, सत्ताधारी आणि प्रशासनाची मेहरनजर असल्याने ही बांधकामे राजरोसपणे उभी आहेत. अनधिकृत बांधकामे वाढत वाढत खारफुटी जागांवर पोहोचली आहेत. त्यामुळे जीवाशी खेळ करत तिथे दोन-दोन मजली झोपडपट्ट्या उभारल्या जात आहेत. त्यात वारंवार अनधिकृत बांधकामे ढासळत आहेत. यात लोकांचा जीव बळी जातो. आपण मात्र शांततेत हा मृत्यूचा तांडव उघड्या डोळ्याने पाहत आहात. यामुळे निर्माण होणारी तुमची असंवेदनशील मुख्यमंत्र्यांची प्रतिमा सामान्यांना हवालदिल करणारी आहे.”