मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे ‘अंडरवर्ल्ड डॉन’ दाऊदशी काय संबंध आहेत, असा सवाल न्यायालयाने केला. त्यावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर जोरदार टीका केली. “नवाब मलिकांचा राजीनामा का घेत नाही? दाऊदची धमकी आहे की शरद पवारांची? तुरुंगात गेल्यानंतर नवाब मलिकांना मंत्रिपदी कायम ठेवणार्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचेही ‘डी गँग’शी संबंध आहेत का,” असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी विचारले आहेत.
किरीट सोमय्या म्हणाले की, “साडेचार महिने झाले. शिवसेना नेते संजय राऊत रोज मनोरंजन करतात. आता राज्यातील जनता त्यांच्यावर हसत आहे. ‘ऑडिट’पासून जे काही ते बोलत आहेत, ते सर्व ऑनलाईन आहे. उद्धव ठाकरे आणि राऊत हे इश्यू ‘डायव्हर्ट’ करत आहेत. मलिक दाऊद संबंध बाहेर येणार, हे माहीत होते. म्हणून लक्ष ‘डायव्हर्ट’ करण्याचा प्रयत्न होता. दाऊदशी संबंध असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही मलिकांना मंत्रिमंडळातून काढले जात नाही. धमकी शरद पवारांची आहे की दाऊदची आहे,” असा सवाल सोमय्या यांनी केला आहे.
“नवाब मलिक म्हणजे दाऊद हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या रस्त्यावर पवारांसोबत आणि न्यायालयाविरोधात काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. न्यायालयसुद्धा पाकिस्तानचे आहे आणि न्यायाधीशसुद्धा मोदींचे आहे, असे म्हणायला उद्धव ठाकरेंनी सुरुवात केली, तर आश्चर्य वाटणार नाही,” असा टोला सोमय्या यांनी लगावला.
एका नेत्यावर कारवाई सुरू
“एका नेत्यावर कारवाई सुरू झाली आहे. पाहूया. मी एवढेच सांगतो. एका नेत्याविरोधातील प्रक्रिया सुरू झाली आहे. काही दिवसांत आपल्यासमोर येणार. चार-पाच लोक रांगेत आहेत, पण नंबर एकाचाच लागतो. समझनेवालो को इशारा काफी हैं,” असे सूचक विधानही त्यांनी केले.
उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे
“वास्तविक ही चौकशी न करता शरद पवार आणि मुख्यमंत्र्यांना मलिकांचा सर्व आर्थिक व्यवहार माहीत होता. हा ‘कॉमनसेन्स’ आहे. उद्धव ठाकरे स्वत: बिल्डर आहेत. त्यांचा मुलगाही बिल्डर आहे. असे व्यवहार बिल्डर लोकांना लगेच कळतात. त्यांच्या ‘मातोश्री’पासून चार किलोमीटरवर ‘गोवावाला कंपाऊंड’ आहे. उद्धव ठाकरेंना त्याचा ‘एफआयएस’ काय होता, हे माहीत नाही? उद्धव ठाकरेंचे एजंट यशवंत जाधवांनी काही वर्षांत ५३ जुन्या इमारती घेतल्या. मलिक यांनी १०० कोटींचा ‘टर्न ओव्हर’चा प्लॉट घेतला. त्यावर उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावे. आता उद्धव ठाकरेंना उत्तर द्यावे लागणार आहे. तुमचे आणि दाऊदचे काय संबंध आहेत, हे सांगावे लागणार आहे. काय बोलणार आहात,” असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्रिपदासाठी सर्व गुंडाळून ठेवले
“१९९२-९३मध्ये दंगली झाल्या. पवार आणि दाऊद एका विमानातून गेले असे बाळासाहेब ठाकरे त्यावेळी भाषणात बोलायचे. बाळासाहेबांची ही भाषणे मी ऐकली आहेत. पण उद्धव ठाकरेंनी केवळ मुख्यमंत्रिपदासाठी सर्व गुंडाळून ठेवले आहे,” अशी टीका सोमय्यांनी केली. “गुन्हा सिद्ध होण्याचे काही राहिलेच नाही. ठाकरे परिवार आणि सरकारने घोटाळे केले. आता महाराष्ट्रातील जनता शिक्षा करणार,” असेही त्यांनी स्पष्ट केले.