नाशिक : सार्वजनिक वाचनालय नाशिक(सावाना)तर्फे दिल्लीत गुरुवार, दि.१० फेब्रुवारी रोजी केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांना कार्यक्षम संसद सदस्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा सोहळा ऑनलाईन पध्दतीने पार पडला. 'नाशिक जिल्ह्यातून एक लाख कोटींची कृषी निर्यात शक्य', असे म्हणत गडकरींनी नाशिककरांमध्ये एक विश्वास निर्माण केला आहे.
सावानाची प्रथा व परंपरा वेगळी आहे. गरीब विद्यार्थ्यांसाठी नाशिकमध्ये सर्वाधिक अभ्यासिका आहेत. नाशिक ही एक सांस्कृतिकनगरी आहे. सावानाने सांस्कृतिक चळवळ अखंडपणे चालविली आहे. अनेक दिग्गजांनी नाशिकला समृद्ध केले आहे. मंत्री डॉ.पवार व खासदार गोडसे यांनी अभ्यास करुन एक पुरस्कार सुरु करावा. नाशिक द्राक्ष व कांदा निर्यात करणार्या नाशिक विभागातील २५ शेतकर्यांचा नागरी सत्कार करावा. कृषी क्षेत्रातले कौशल्य, तंत्रज्ञान व ज्ञान हे महाराष्ट्रात नाशिकमधून फैलावते.", असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यावेळी म्हणाले. "नाशिक हे फूडकल्चर सेंटर असल्याने या जिल्ह्यातून कमीत कमी एक लाख कोटींची कृषी निर्यात झाली पाहिजे. महाराष्ट्रात भविष्यात आठ ड्रायपोर्ट तयार करण्यात येणार असल्याने शेतमालाचा खर्च वाचेल. तसेच ड्रायपोर्टमधून थेट बांगलादेशमध्ये शेतमाल जाईल.", असा विश्वासही त्यांना यादरम्यान व्यक्त केला.
"सार्वजनिक वाचनालय नाशिक संस्थेस १८१ वर्षांचा इतिहास आहे. या संस्थेस स्वातंत्र्यवीर सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु, अटलबिहारी वाजपेयी यांनी भेट दिली आहे. सावानाचा सभासद असणे हा अभिमानाचा विषय आहे. यंदापासून प्रथमच स्व. माधवराव लिमये कार्यक्षम संसद सदस्य पुरस्कार दिला जात आहे. पुरस्कार निवड समितीने जेव्हा माझी अध्यक्षपदी निवड केली तेव्हा सुरुवातील हे काम अवघड वाटत होते. समितीने निकष समोर ठेवल्याने प्रथम केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे नाव सुचले. त्यांनी महाराष्ट्रात बांधकाम मंत्री असताना उल्लेखनीय काम केले असून, आजही त्यांच्या कामांचा गवागवा होताना दिसत आहे. नितीन गडकरी हे दूरदृष्टी असलेले नेते आहेत. त्यांनी देशाच्या विकासाला दिशा देण्याचे काम केले आहे. केंद्रिय रस्तेविकास मंत्री म्हणून गडकरी यांनी देशात वेगळी ओळख निर्माण केली आहे.", असे खासदार गोडसे म्हणाले.
खासदार विनय सहस्रबुध्दे यांनी सुध्दा आपले मत व्यक्त केले. "केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळत असते. त्यांचा आयुष्यभर मी कृतज्ञ आहे. ते धडाडीने व कल्पकतेने काम करत इतरांना प्रोत्साहन देत असतात. आज समाजात अनेक खासदार मंडळी मार्गदर्शक आहेत पण मेन्टॉर्स नाहीत. मंत्री गडकरी हे युवकांचे मेन्टॉर्स आहेत. त्यांनी युवकांना मार्गदर्शन करुन आपल्या पायावर उभे केले आहे. ते युवकांना सांगतात की, पैसा जमा करण्यासाठी राजकारणात येऊ नका. हा संदेश युवा पिढीने अंमलात आणला तर राजकारणाचे शुद्धीकरण होईल आणि युवकांचे भले होईल.", असे ते म्हणाले.
गडकरी यांनी आपल्या पुरस्काराचे ५० हजार रुपये आणि स्वत:कडचे ४.५० लाख रुपये; असे एकूण ५ लाख रुपयांचा धनादेश देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महाराष्ट्रातील आयआयटी व इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेऊन वेगवेगळे मॉडेल तयार करण्याबाबत आणि जो दर्जेदार मॉडेल तयार करेल त्यास ५ लाखांचे बक्षीस देण्याबाबत गडकरींनी सुचवले आहे.