नवी दिल्ली : स्वातंत्र्यसेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी संशोधन करण्यासाठी तैवान सरकारने भारतीय संशोधक आणि इतिहासकारांना तैवानला येण्याचे निमंत्रण दिले आहे. खास यासाठी तैवान सरकारने आपले राष्ट्रीय अभिलेखागार उघडण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतल्या तैवान दूतावासाचे उपप्रतिनिधी मुमिन चेन हे शनिवारी सुभाषचंद्र बोस यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त एफआयसीसीआयद्वारे आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित होते.
'नेताजींचा तैवानशी खूप चांगला संबंध होता. १९३० ते १९४० या दशकात त्यांचा तैवानवर चांगला प्रभाव होता. भारत आणि नेताजी यांच्याशी आमचे १९४० पासून ऐतिहासिक संबंध आहेत. जे कदाचित तैवानच्या लोकांनाही माहित नसावेत.', असे मुमिन चेन यांनी कार्यक्रमात सांगितले. त्याकाळात तैवानवर जपानचा ताबा असल्याचेही ते म्हणाले.
'तैवानचे राष्ट्रीय अभिलेखागार आणि संप्रेषणाची इतर साधने भारतीयांना अभ्यासासाठी खुली करण्यात आली आहेत. तैवानमधल्या अनेक तरुण इतिहासकारांना दक्षिण-पूर्व आशिया आणि भारताचा अभ्यास करण्यात रस आहे. तैवानमध्ये नेताजी आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे अनेक ऐतिहासिक दस्तऐवज आजही अस्तित्वात आहेत, ज्याबद्दल फार कमी भारतीयांना माहिती आहे.', असे तैवानच्या डिप्लोमॅटने सांगितले.