संसारात काहीतरी घडल्याशिवाय असे बोल माणूस बोलत नसतो; दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

    17-Sep-2021
Total Views |
bjp _1  H x W:



औरंगाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना शिवसेना-भाजप संभाव्य युतीबाबत एक वक्तव्य केले. हे वक्तव्य करताना केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपस्थित होते. त्यांच्याकडे बघून मुख्यमंत्र्यांनी “व्यासपीठावर उपस्थित असलेले माझे आजी-माझी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असं म्हटले. यावर प्रतिक्रिया देताना दानवेंनी म्हणाले की, संसारात काहीतरी घडल्याशिवाय असे बोल माणूस बोलत नसतो.
 
 
 

रावसाहेब दानवे म्हणाले...
 
 
रावसाहेब दानवे यांनी भाजपा शिवसेनेसोबत एकत्र यायला केव्हाही तयार असल्याचं सांगितलं. “शिवसेना-भाजपा हे समविचारी पक्ष आहेत. प्रमोद महाजन आणि बाळासाहेब ठाकरेंनी ही युती घडवून आणली आणि गेली २५-३० वर्ष आम्ही एकत्र काम केलं. राजकारणात काहीही घडू शकतं अशी एक घटना राज्यात घडली आणि शिवसेनेने राष्ट्रवादी-काँग्रेससोबत घरोबा केला. कदाचित मुख्यमंत्र्यांना जो अनुभव आला असेल, त्याच्या आधारावर ते बोलले असतील की रावसाहेब भविष्यात आपण एकत्र येऊ शकतो. भाजपाची हीच भूमिका आहे की आम्ही समविचारी पक्ष आहोत. समविचारी पक्ष एकत्र येऊ शकतात. शिवसेनेच्या बाजूचा अनुभव लक्षात घेता त्यांची आमच्यासोबत येण्याची इच्छा असेल, तर भाजपा कधीही या विचाराशी सहमतच राहणार आहे”, असं ते म्हणाले.

 

“संसारात काहीतरी घडल्याशिवाय असे बोल माणूस बोलत नसतो. मुख्यमंत्र्यांना आमचाही अनुभव आहे आणि त्यांचाही अनुभव आहे. आम्ही याच भावनेचे आहोत की जरी शिवसेनेने आम्हाला सोडून तिकडे घरोबा केला असेल, तर राज्यातल्या दोन्हीही मतदारांना त्यांचं तिकडे जाणं पसंत पडलेलं नाही, अजूनही मतदारांना असं वाटतंय की त्यांनी इकडे यावं. जे मतदारांचं मत आहे, तेच आमचं मत आहे”, असं देखील दानवेंनी नमूद केलं.