
मुंबई : म्हाडाच्या कोंकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाने कल्याण, मीरा रोड, विरार, नवी मुंबई, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यातील विविध गृहप्रकल्पांतर्गत ८ हजार ९८४ सदनिकांच्या विक्री करिता २३ ऑगस्ट २०२१ रोजी सोडतीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
या जाहिरातीत मंडळाने अर्जदारांसाठी अटी व शर्ती घातल्या आहेत. घरांचा दावा न्यायालयात प्रलंबित असल्यास तसेच यापूर्वी त्या घरांचा ताबा झाला असल्याचे पडताळणी दरम्यान समजल्यास अर्जदाराला कोणत्याही न्यायालयात दावा दाखल करता येणार नसल्याची अट जाहिरातीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
या सोडतीच्या जाहिरातीत (क) कोकण म्हाडा गृहनिर्माण योजनेच्या मिरारोड संकेत क्र ११७ सी ,११८ सी विरार बोळींज संकेत क्र २५६ बी,२६३बी,२६४बी वेंगुला सिंधुदुर्ग संकेत क्र २६४ अ ,२६८अ ,२६९अ संकेत क्र २७४अ ,२७८ अ सदनिकांच्या बाबतीत बांधकाम पूर्ण झालेल्या सदनिका जशा आहेत. तश्या स्थितीमध्ये वितरित करण्यात येत आहेत.
सोडतीमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या या विखुरलेल्या सदनिका असून ह्या सदनिकांबाबत कोणत्याही न्यायालयात दावा प्रलंबित असल्यास तसेच यापूर्वी ताबा झाला असल्यास पडताळणी अंती योग्य तो निर्णय घेण्यात येऊन सदरचा निर्णय अर्जदारांस बंधनकारक राहील, अशी अट मंडळाने घातली आहे.
या प्रकियेदरम्यान कोणत्याही न्यायालयात दावा अर्जदाराला दाखल करता येणार नाही तसेच भरणा केलेल्या रक्कमेवर व्याजाची मागणी सुद्धा करता येणार नाही, अशा प्रकारची प्रकरणे निर्दशनास आल्यास त्याचा निपटारा मंडळाच्या स्तरावर लवकरात लवकर करण्याची तजवीज केली जाईल.असे नमूद असल्याने अर्जदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.