नवी दिल्ली : तैवानच्या पूर्व भागामध्ये एक रेल्वे रुळावरून घसरल्याने मोठा अपघात झाला. यामध्ये अद्याप ३६ लोकांचा मृत्यू झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात झालेल्या रेल्वेतून ३५० प्रवासी प्रवास करत असल्याची माहिती आहे. त्यापैकी ८० ते १०० लोकांची पहिल्या चार डब्यांमधून सुटका करण्यात आली. तैवानच्या केंद्रीय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रक व्यवस्थित पार्क न केल्याने तो रेल्वेलाईन वर कोसळला आहे. इतर प्रवाशांची सुटका करण्यासाठी मदतकार्य सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तैवानमधील पूर्व तैवानमध्ये रेल्वेलाईनवरील पुलावरून एक ट्रक रेल्वे रुळावर अचानक कोसळला, यामुळे ही दुर्घटना झाल्याची माहिती आहे. या अपघातात रेल्वेचे चार डबे अपघातग्रस्त झाल्याची माहिती बचावकर्त्यांनी दिली. बोगद्यामध्ये डबे रेल्वे रुळावरुन घसरले, यामध्ये अद्याप ३६ जणांचा मृत्यू झाला. ही रेल्वे तैतुंगला जात होती त्यावेळी ह्युलियन प्रांताच्या उत्तर भागात हा अपघात झाला. अपघातग्रस्त रेल्वे अजूनही त्याच बोगद्यात अडकली असल्याची माहिती आहे.