मुंबई : बीडमधील तरुणी पूजा चव्हाण या तरुणीच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी रोखठोक भूमिका घेणाऱ्या भाजप नेत्यांना आता धमकीचे फोन येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांना काल १४ फेब्रुवारी रोजी धमकीचे फोन आल्यानंतर आता भाजप आमदार अतुल भातखळकर यांनाही धमकीचे फोन आल्याचे कळते. याबाबत भातकाहलकर यांनी ट्विट करत माहिती दिली.
भातखळकर ट्विट करत म्हणाले,"पूजा चव्हाणच्या संशयास्पद आत्महत्येबाबत आवाज उठवल्यामुळे काल पासून धमक्यांचे फोन येतायत. ठाकरे सरकार आल्यापासून ही झुंडशाही बळावली आहे. धमक्यांनी बधणारा मी नाही हे सरकार प्रायोजित गुंडांनी लक्षात घ्यावे." असे म्हणत त्यांनी राज्यातील कायदा व सुव्यस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारवर घणाघाती आरोप केले.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांना काल १४ फेब्रुवारी रोजी धमकीचे फोन
तत्पूर्वी, भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी देखील स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली होती. पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात सुरुवातील नाव घेता सुरु असणाऱ्या चर्चेत चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते आणि राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचं नाव घेऊन सोशलमीडिया व प्रसारमाध्यमांतून गंभीर आरोप केले होते.यावरूनच त्यांना आता धमकीचे फोन येत असल्याचे समोर येत आहे. याबाबत त्यांनी पोलिसात तक्रार अर्ज दिला असल्याची माहिती त्यांनी दै. मुंबई तरुण भारतशी बोलताना दिली. त्यांनी ट्विट केले आहे की, राज्यसत्तेकडे प्रचंड ताकद असते सर्वसामान्य माणसाचा पाशवी राजसत्तेपुढे टिकाव लागू शकत नाही. मीडिया आणि सोशल मीडियाच्या व्यासपीठावरून ज्यांनी राजसत्तेला आव्हान देण्याचा प्रयत्न केला त्यांना पोलिस बळाचा वापर करून चिरडण्याचे प्रकार दिवसाआड होतायत. राजसत्ता पाठीशी असल्यानेच तर “कर असली तरी डर कशाला?” ही मानसिकता बळावली आहे. राजदंडाचे अभय मिळाले आणि सामाजिक न्याय अबाधित राहिलं. पूजा चव्हाणला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले तिच्यावर अत्याचार केले त्यालाही कदाचित असचं अभय मिळेल..? मात्र धमक्यांना घाबरणारी चित्रा वाघ अजिबात नाही त्यामुळे उगा मला फोनकरून वेळ वाया घालवू नका माझ्या भावड्यांनो. जिथे जिथे महिलांवर अन्याय अत्याचार होणार तिथे तिथे नडणार आणि भिडणारचं." असे म्हणत त्यांनी राज्यसरकारवर निशाणा साधला. तसेच राठोड यांचे ‘आयुष्य उद्ध्वस्त’ होणार या भीतीने खुद्द मुख्यमंत्री चिंताक्रांत आहेत. मुख्यमंत्र्यांनी व्हायरल झालेल्या त्या ऑडीयो क्लीप ऐकल्या असत्या तर कोण आयुष्यातून उठले आहे आणि कोणामुळे हे त्यांच्या लक्षात आले असत, असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.