मुंबई: राज्य सरकारने मोकळ्या जागेत सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे. त्यामुळे आता लोक कलाकारांना आपल्या लोककला सादर करता येणार आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी मिळाल्याने आता दीड वर्षानंतर शाहिरीपासून ते तमाशाच्या फडापर्यंत कार्यक्रम रंगणार आहेत.
राज्य सरकारने आज एक पत्रक काढलं आहे. त्यानुसार राज्यात सांस्कृतिक कार्यक्रम आणि लोककलांना मोकळ्या जागेत कार्यक्रम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोरोनामुळे तमाशा, शाहिरी, भारुड या लोककलांना कार्यक्रम सादर करण्यास परवानगी नव्हती. आपल्यालाही सांस्कृतिक कार्यक्रम करण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी तमाशा लोककलावंत परिषदेने शासनाकडे केली होती. याअनुषंगाने बंदिस्त सभागृहे आणि मोकळ्या मैदानात सर्व सांस्कृतिक कार्यक्रम व लोककला सादर करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली आहे. त्याबाबतचे आदेशही जारी करण्यात आले आहेत.
यात तमाशा, दशावतार, भारुड, शाहिरी इत्यादी कार्यक्रमासह टुरिंग टॉकिजला परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच या सर्वांना कोरोनाच्या अटींचे पालन करण्याचे बंधनही घालण्यात आले आहे. सरकारच्या या निर्णयामुळे तमाशा कलावंताना मोठा दिलासा मिळाला आहे.