मुंबई कुणाच्या बापाची जहागीर नाही : आठवले

    10-Sep-2020
Total Views |

Ramdas Athawale_1 &n
 
मुंबई : सध्या कंगना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला असताना रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी अभिनेत्री कंगना रानौतची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी “मुंबईत कुणालाही घाबरण्याचे कारण नाही. मुंबई जशी शिवसेनेची आहे तशी ती भाजप, रिपाइं, राष्ट्रवादी, काँग्रेस या पक्षांची आणि सर्व भाषिकांचीही आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत राहण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. मुंबई कुणाच्या बापाची जहागीर नाही” असे म्हणत महाराष्ट्र सरकारवर टीकादेखील केली आहे. त्याचसोबत कंगनाला ‘आमचा पक्ष तुमच्या सोबत आहे’ असे आश्वासनही दिले आहे.
 
 
 
एक तासाच्या भेटीनंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले की, “कंगणाने मुंबई बद्दल केलेल्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. पण, ती एक महिला आहे तिच्याबद्दल अशी भाषा वापरणे चुकीचेच आहे. महिला म्हणून तिला संरक्षण देणे ही आमची नैतिक जबाबदारी आहे.” पुढे ते म्हणाले की, “कंगणाचे ऑफिस तोडायला नको होते. याआधी का तिच्यावर कारवाई केली नव्हती? शिवसेना आणि अनेक पक्षांची कार्यालये अवैध आहेत. ती तुम्ही तोडणार आहात का? मुख्यमंत्रांबद्दल बोलताना आदरपूर्वक बोलले पाहिजे, याचे मी समर्थन करत नाही. मात्र, अशा प्रकारे सूडबुद्धीने कारवाई करणे योग्य नाही. ५२ हजार कामे मुंबईत अवैध आहेत, ती तुम्ही तोडणार आहात का?,” असा प्रश्न आठवलेंनी यावेळी राज्य सरकारला विचारला आहे.