मुंबई : मुंबई मेट्रो ३चे कारशेड कांजुरमार्गला स्थलांतरित करण्यावरून महाविकास आघाडी सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहे. याचे कारण म्हणजे कांजूरमार्ग येथील १०२ एकर जागा एमएमआरडीएला हस्तांतरित करण्याच्या मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाबाबत उच्च न्यायालयाने सोमवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
तसेच जिल्हाधिकारी आपला आदेश मागे घेऊन सगळ्या पक्षकारांची नव्याने सुनावणी घेणार का? की जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायदेशीर प्रक्रियेला अनुसरून नसल्याचा निष्कर्ष देऊन तो आम्ही रद्द करू? अशी विचारणा न्यायालयाने सरकारला केली. यावरून आता भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी या मुद्यावरून ठाकरे सरकारला टोला लगावला आहे. “उच्च न्यायालयाने जिल्हाधिकार्यांना मुंबई मेट्रो कांजूर शेड जमीन आदेश मागे घेण्यास किंवा पुनरावलोकन करण्यास सांगितले. ठाकरे सरकारच्या राजहट्ट बालहट्टासाठी पाच वर्षे व पाच हजार कोटी रुपये मोजावे लागणार.” अशी टीका सोमय्या यांनी ट्विटद्वारे केली.