कागर - स्त्री शक्तीचा उदय

    26-Apr-2019
Total Views |
 
 

देशात सगळीकडे राजकारणाबद्दल चर्चा सुरू असताना त्यावरच आधारीत मकरंद माने दिग्दर्शित 'कागर' हा चित्रपट आज महाराष्ट्रभर प्रदर्शित झाला. गावपातळीवरील राजकारण म्हटलं की पाठींबा, विरोध आणि डावपेच या गोष्टी ओघाने आल्याच. त्यातून निर्माण होणारे संघर्ष, वाद हे देखील त्याचाच एक भाग. आणि मग सुरु होतो 'कागर' या चित्रपटाचा प्रवास.

कथा : या चित्रपटाची कथा फिरते दोन राजकारणी आणि त्यांचे एक राजकीय गुरु किंवा राजकीय सल्लागार यांच्याभोवती. सत्तेची हवा एकदा डोक्यात गेली की मग नाती- गोती, प्रेम, आस्था या कोणत्याच गोष्टी त्या व्यक्तीला महत्वाच्या वाटत नाहीत. आणि हेच घडलं विराईनगर या गावात. भैय्यासाहेब आणि आबासाहेब गायकवाड यांच्यामधील सत्तेसाठीच्या लढतीत त्यांचे राजकीय गुरु तसंच राणीचे वडील म्हणजेच प्रभाकरराव देशमुख, पण बऱ्याच वर्षांपासून उराशी बाळगलेलं त्यांचं सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न कोण पूर्ण करणार यासाठीचा संघर्ष म्हणजे 'कागर'. मात्र या राजकारणात रिंकू राजगुरू (प्रियदर्शिनी देशमुख) आणि शुभंकर तावडे (युवराज) यांच्यामध्ये खुलणारी प्रेमाची कळी ही कथा एका वेगळ्याच वळणार घेऊन जाते ती कशी हे तुम्हाला चित्रपट पाहिल्यावरच कळेल.


भूमिका : चित्रपटाचा पहिलाच सिन सोडल्यास बाकी चित्रपट अतिशय खरा वटतो. चित्रीकरण फलटणजवळच्या एका गावात करण्यात आल्यामुळे तो गावाकडचा एक रांगडेपणा चित्रपटात आला आहे. रिंकू राजगुरू म्हणजेच चित्रपटातील नायिका प्रियदर्शिनी देशमुख उर्फ राणी
, मोठ्या पडद्यावर पदार्पण करणारा शुभंकर तावडे म्हणजेच युवराज या दोघांनी या चित्रपटात अतिशय उत्तम भूमिका बजावल्या. दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. मात्र प्रियदर्शिनी राजकारणात उतरल्यानंतर तिचा आत्मविश्वास, जिद्द, तरुण राजकारणी आणि तितकीच प्रेमळ हे सगळे गुणधर्म आपल्याला तिच्या भूमिकेतून आपल्याला दिसू शकतात तर शुभंकर म्हणजेच युवराज हा धडाडीचा कार्यकर्ता आणि त्याच्या जवळच्या माणसांसाठी आपले प्राण देखील देऊ शकेल इतका दिलदार. त्यांच्याचबरोबर मिलिंद फाटक, महेश भोसले, उमेश जगताप आणि शशांक शेंडे यांनी देखील उत्तम भूमिका बजावली.

संगीत :
चित्रपटात योग्य त्या वेळी गाण्यांचा उपयोग करण्यात आला. विशेषतः गाण्याचे शब्द अतिशय समर्पक असून अपेक्षित आशय आपल्यापर्यंत पोहोचवतात. त्यामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत होते.


अखेर चित्रपटादरम्यान काही वेळा दिग्दर्शकाला नक्की काय सुचवायचे आहे हे लक्षात येत नाही मात्र जसजसे कथा उलगडते प्रत्येकाला एक वेगळा मतितार्थ या कथेमध्ये सापडू शकतो. 'जुना जातो तेव्हाच नवा येतो' हे राजकारणातील कटू सत्य आहे आणि 'कागर' ही स्त्री शक्तीच्या उदयाची कथा आहे या दोन गोष्टी तुमच्या मनावर छाप पाडतात. त्यामुळे राजकारण आणि प्रेमाच्या संघर्षातून तयार झालेला 'कागर' तुम्ही जरूर पहा.
 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो कराtwitter.com/MTarunBharat