महिला सक्षम असेल तरच देश बलशाली होईल

    23-Jun-2018
Total Views |



 

मुंबई : “काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत आणि उत्तर पूर्वेपासून पश्चिम सागरापर्यंत प्रत्येक घरातील महिला सक्षम असेल, तरच देश बलशाली होईल” असे मत भाजयुमो राष्ट्रीय अध्यक्ष खासदार पूनम महाजन यांनी तामिळनाडू मधील करूर येथे आयोजित एका मेळाव्यात बोलताना व्यक्त केले. भाजयुमोच्या वतीने केंद्र सरकारच्या कामाविषयी जागरूकता आण्याकरिता देशभरामध्ये विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, त्या अंतर्गत पूनम महाजन दोन दिवसांच्या तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. यावेळी खासदार महाजन यांनी तामिळनाडू मधील सर्वच पक्षांवर ताशेरे ओढले. त्या पुढे म्हणाल्या की “महिला सक्षमीकरणाचे महत्व संपूर्णपणे जाणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सक्षमीकरणासाठी उज्वला योजनेसारख्या अनेक योजना गेल्या चार वर्षात सुरु केल्या आणि प्राधान्य देऊन राबविल्या. पूर्वी विधवांना १०२० रुपये वाटेल तशी पेन्शन दिली जात असे मात्र पंतप्रधानपदी मोदीजी आल्यानंतर त्यांनी सर्व विधवांना एकसारखी पेन्शन द्यायचा निर्णय घेतला.”

 
यावेळी लक्षणीय उपस्थिती असलेल्या महिलांना लक्ष्मी संबोधत महाजन म्हणाल्या की, “भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ आहे, ज्यावर लक्ष्मी विराजमान असते. जर लक्ष्मी आनंदित असेल तर कमळ फुलेल. द्रमुकचा सूर्य अस्ताला जात असून तो केवळ पुत्र पौत्रांचा खाजगी पक्ष बनला आहे आणि अण्णाद्रमुकची दोन पाने दोन विरुद्ध दिशाना बघत आहेत “अशी टीका करत नव्याने स्थापन झालेल्या कलाकारांच्या पक्षांवर देखील त्यांनी जोरदार हल्ला चढवला. “या काँग्रेसशी हात मिळवणाऱ्या लोकांनी सुपरस्टार असताना जनतेसाठी काय केले असा सवाल करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच देशासाठी दिवसाचे २४ तास देत कष्ट आणि त्याग करणारे देशाचे खरे सुपुत्र आहेत असे प्रतिपादन पूनमताईंनी यावेळी केले.