गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये एका परिषदेसाठी भोपाळला गेले होते. भोपाळ म्हणजे मध्य प्रदेशची राजधानी. धारानगरीच्या परमार राजा भोजाच्या वास्तव्याने पुनीत झालेले हे शहर. भोपाळचे जुने नाव भोजपाल. भोजराजाने दोन डोंगरांमध्ये बांध घालून बांधलेला प्रचंड तलाव आजही भोपाळचं सर्वात मोठं आकर्षण आहे. भोजताल ह्या नावाने प्रसिद्ध असलेल्या ह्या तलावाकाठी संध्याकाळी अवघं भोपाळ लोटतं. असं म्हटलं जातं की, भोजराजाने हा बांध अकराव्या शतकात बांधुन घेतला. सध्याचं आधुनिक भोपाळ शहर दोस्त मोहम्मद खान ह्या मुघल सरदाराने अठराव्या शतकात वसवलं असं मानलं जातं. १८१८ मध्ये भोपाळच्या नवाबाने ब्रिटिशांबरोबर तह केला आणि स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत भोपाळवर नवाबांचाच अंमल राहिला.
परिषदेनंतरचे तीन दिवस मला नुसतं भटकायचं होतं. पण प्रश्न होता रोख पैशांचा. आठ नोव्हेंबरला पंतप्रधान मोदींनी ५०० आणि १००० च्या नोटा रद्द केल्याचं जाहीर केलं, नऊ आणि दहाला तारखेला बॅंका बंद होत्या आणि अकरा तारखेला मला भोपाळला जायचं होतं. पाकिटात होत्या फक्त पाचशेच्या तीनेक नोटा आणि शंभरच्या तीन नोटा, वर काही चिल्लर. परिषदेच्या तीन दिवसात सगळी व्यवस्था आयोजकांनी केली होती पण पुढचे तीन दिवस माझी मीच एकटी भटकणार होते. रोख रक्कम थोडी तरी हातात हवी होती.
परिषदेच्या आयोजनामध्ये काही मध्ये प्रदेश टुरिजमचे अधिकारी सामील होते. त्यातल्या एकाला भेटून मी माझी अडचण सांगितली. त्याने एक चांगली गाडी करून दिली. गाडीच्या मालकाला मी सांगितलं की माझ्याकडे रोख रक्कम नाही, तर तो म्हणाला, 'काही हरकत नाही, मी माझा बॅंक अकाऊंट नंबर देतो, तुम्ही पैसे ट्रान्सफर करा'. माझा फार मोठा प्रश्न सुटला होता. हॉटेलचं बिल तर कार्डनेच देणार होते, आता फक्त रस्त्यावर हातखर्चासाठी काही रक्कम पाहिजे होती. सुदैवाने स्टेट बॅंकेच्या एका एटीएम मधून दोन हजार रुपये काढता आले आणि तोही प्रश्न सुटला.
माझा पहिला मुक्काम होता भीमबेटकाची शैलगृहे आणि तिथली नव-पाषाण युगीन भित्तीचित्रे. भीमबेटका म्हणजे भोपाळपासून ४५ किलोमीटर दूर विंध्य पर्वताच्या कुशीत दडलेला एक प्रचंड प्रस्तरसमूह आहे. इथल्या गुहांमध्ये आदिमानव समूहाने राहायचे. त्यांनी तिथल्या पाषाण भिंतीवर अनेक चित्रे काढलेली आहेत. वेगवेगळ्या रंगाचे दगड कुटून आणि पाण्यात खलून बनवलेले पूर्णपणे नैसर्गिक रंग, लाल माती आणि झाडांच्या काडीचे दातांनी चावून चावून मऊ बनवलेले कुंचले ह्यांच्या साहाय्याने काढलेली ही भित्तिचित्रे भारतातली सर्वात प्राचीन भित्तीचित्रे समजली जातात. भीमबेटकाच्या प्रस्तरचित्रांमधली सगळ्यात प्राचीन चित्रे जवळजवळ १२००० वर्षांपूर्वीची आहेत असे पुरातत्वशास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भीमबेटकाच्या पंचक्रोशीत अशी जवळजवळ ५०० शैलगृहे आहेत जिथे अशी प्रागैतिहासिक भित्तीचित्रे बघायला मिळतात, पण सर्वसामान्य पर्यटक फक्त भीमबेटकापर्यंतच जाऊ शकतो, कारण बाकीच्या गुहांपर्यंत जायला रस्ते नाहीयेत. तिथे पायीच जावं लागतं. भीमबेटकाच्या गुहा तिथे जवळपास वस्ती करून असलेल्या आदिवासी लोकांना फार वर्षांपासून माहिती होत्या, पण त्यांना वाटायचं की ह्या गुहांमधली चित्रे म्हणजे चेटकिणींचे लिखाण आहे, म्हणून ते भीतीपोटी तिथे कधी जायचे नाहीत.
आधुनिक जगासाठी ह्या गुहांचा शोध लावला तो श्रीधर विष्णू वाकणकर ह्या मराठी पुरातत्वशास्त्रज्ञाने. १९५७ मध्ये वाकणकर आगगाडीने दिल्लीहून भोपाळला जात होते. रेल्वेचा मार्ग ह्या गुंफांच्या अगदी जवळून जातो. गाडीतल्या आपल्या डब्यात बसून खिडकीतून बाहेर बघत असताना वाकणकरांना भीमबेटकाचे प्रचंड प्रस्तर दिसले. त्यांचं कुतूहल जागृत झालं. भीमबेटकाच्या जवळ कुठलंही स्टेशन नव्हतं त्यामुळे वाकणकर पुढच्या स्टेशनला गाडीतून उतरले आणि रुळांवरून मागे मागे चालत निघाले, भीमबेटकाच्या प्रस्तरांच्या शोधात. जिथून भीमबेटकाच्या मोठ्या शिळा दिसायला लागतात तिथे वाकणकरांना एक छोटं गांव लागलं. डोंगरावर दिसणाऱ्या त्या प्रचंड प्रस्तरखंडाकडे बोट दाखवून वाकणकरांनी गांवकऱ्यांना विचारलं की वर काय आहे. गांवकरी म्हणाले, 'डोंगरावर गुहा आहेत, तिथे पांडव राहायचे. त्या मोठ्या शिळेवर भीम बसायचा म्हणून त्याला भीमबेटका म्हणजे भीमाची बैठक असं म्हणतात.’
वर गुहा आहेत हे ऐकल्यावर वाकणकरांचे डोळे चमकले. त्यांनी वर जायचं ठरवलं, पण त्यांच्याबरोबर वाटाड्या म्हणून जायला गावातलं कोणीच तयार होईना. 'वर चेटकिणींची चित्रे आहेत, आम्ही नाही येणार वर', असाच सगळ्या गावकऱ्यांचा सूर होता. शेवटी वाकणकर एकटेच त्या काट्याकुट्यांमधून वर डोंगरावर चालत गेले आणि त्यांना गवसलं आदिमानवाच्या कल्पनेतून साकारलेलं एक अद्भुत विश्व! आज भीमबेटकाच्या गुहा आणि त्या गुहांमधली भित्तिचित्रे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत आहेत. तिथपर्यंत जायला चांगला पक्का रस्ता आहे. इतर सोयी-सुविधा आहेत, पण वाकणकर त्या काळात त्या निर्जन जंगलातून वाट काढत कसे वर गेले असतील ह्याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा येतो. वाकणकरांना पुढे ह्या त्यांच्या ह्या कार्यामुळे भारत सरकारने पद्मश्री ह्या पदवीने सन्मानित केले.
उन्हे वर जायच्या आत मला भीमबेटकाला पोचायचं होतं म्हणून सकाळी सातलाच भोपाळहून निघाले. मध्यप्रदेश मधले रस्ते चांगले आहेत आणि सकाळी लवकर निघाल्यामुळे रहदारीही फारशी नव्हती, त्यामुळे दिड तासातच भीमबेटकाला पोचले. गाईडची चौकशी केली तर तिथे तशी काही व्यवस्था नव्हती. पण तिथला एक इंद्रजित नावाचा पोरगेलासा चौकीदार म्हणाला, 'मी दाखवू शकतो तुम्हाला सगळी चित्रे'. त्याला संगती घेऊन मी निघाले. सकाळची वेळ असल्यामुळे माझ्याशिवाय दुसरा कुणीही पर्यटक आलेला नव्हता. सागवानाच्या झाडांच्या राईमधून आम्ही चालत निघालो. सागाची खाली पडलेला पाचोळा आमच्या पायाखाली चुरडला जात होता त्याचा आवाज सोडल्यास दुसरा कुठलाच आवाज ऐकू येत नव्हता. मला एकदम १२००० वर्षे मागे गेल्यासारखं वाटलं. तेव्हाही अशीच नीरव शांतता असेल का भीमबेटकामध्ये?
गुहांमध्ये जाताना पहिलीच गुहा लागते ती म्हणजे दोन प्रचंड प्रस्तर एकमेकांवर कलून झालेली मोठ्ठी दालनासारखी जागा. 'हा ऑडीटोरियम', इंद्रजित म्हणाला. 'पूर्वी आदिमानव इथे जमून एकत्र उपासना वगैरे करत असत कदाचित. तुम्ही इथे मोठ्यांदा बोलून बघा, आवाज किती घुमतो ते'. खरंच त्या हॉलवजा जागेचे अकूस्टीक्स इतके चांगले होते की मोठमोठ्या नाट्यगृहांनी मान खाली घालावी. ह्या गुहेत असलेल्या भित्तीचित्रांमध्ये एका लहान मुलाच्या हाताचा ठसा आहे. 'हा आदिमानव काळातल्या मुलाच्या हाताचा ठसा' इंद्रजित म्हणाला. त्या ठश्याजवळ माझा हात लावून बघताना का कोण जाणे मला भरून आले. कुठला कोण मुलगा, पण त्याच्या आणि माझ्यात कुठलं तरी अनामिक बंधन होतं नक्कीच. कदाचित त्या अदृश्य धाग्यालाच भारतीयता म्हणत असावेत. ह्याच गुहेत हत्ती, हरीण, वाघ, चितळ, बैल, मोर इत्यादी प्राणी दाखवले आहेत. मुखत्वे लाल रंगाची पार्श्वभूमी आणि त्यावर पांढऱ्या रंगाचा वापर करून ही चित्रे काढलेली आहेत. तिथून थोडं पुढे चालत गेलो की 'झू शेल्टर' नावाची गुहा लागते. ह्या एकाच गुहेच्या छतावर जवळ जवळ ४५० चित्रे आहेत त्यातली २५२ चित्रे जनावरांची आहेत. १६ वेगवेगळ्या प्रकारची जनावरे आपल्याला ह्या चित्रांमधून स्पष्ट ओळखता येतात. इतक्या जनावरांची चित्रे आहेत म्हणून ह्या गुहेला 'झू शेल्टर' असं नाव दिलं गेलंय. ह्याच गुहेमध्ये एक मिरवणूक दाखवली गेली आहे. घोड्यावर बसलेली काही माणसे आहेत, त्यांच्या हातात तलवारी आणि भाले आहेत. बरोबर ढोलकी वाजवणारे दोन वाजंत्री आहेत आणि राजदंडासारखा उंच दंडुका घेऊन चालणारा एक माणूस आहे. भारतात घोडा हे जनावर अस्तित्वात असल्याचा हा सगळ्यात पुरातन पुरावा!
थोडं पुढे गेलं की बेअर रॉक नावाची गुहा लागते. ह्या गुहेच्या वरच्या पाषाण भिंतीवर जमिनीपासून जवळ जवळ वीस फुटांवर एक प्रचंड मोठं रानडुकरासारख्या दिसणाऱ्या प्राण्याचं लाल रंगात काढलेलं चित्र आहे. त्याच्या डोक्यावर दोन टोकदार शिंगे आहेत आणि नाकावरचे केस स्पष्ट रंगवले आहेत. ह्या रानडुकराला बघून घाबरून पळून जाणारा एक माणूस पुढे दाखवलेला आहे आणि मागे त्या रानडुकराची शिकार करायला बघणारी इतर दोन माणसे आहेत. खाली एक खेकडादेखील रंगवलेला आहे. इंद्रजित म्हणाला की बांबूची शिडी वापरून हे चित्र इतक्या उंचावरती रंगवले गेलेले आहे. ह्या चित्रांमध्ये काढलेला घोडा म्हणजे अगदीच प्राथमिक स्वरूपाचं लाईन ड्रॉईंग आहे, एकमेकांना जोडलेले दोन त्रिकोण, खाली पायांसाठी म्हणून ओढलेल्या चार रेघा, शेपटीची एक रेघ आणि तोंडासाठी म्हणून एक वेगळा त्रिकोण, असं अगदी लहान मुलांनी काढावं असं जुजबी स्वरूपाचं चित्र आहे घोड्याचं.
पण पुढे आपण एका गुहेत एक अत्यंत ऐटबाज, पुढचा एक पाय उंचावलेला पांढराशुभ्र घोडा बघतो तो मात्र एनाटॉमीच्या दृष्टीने अत्यंत सुरेख जमलेला आहे. 'हे घोड्याचं चित्र बऱ्याच नंतरच्या काळातलं आहे, जेव्हा त्या लोकांना चित्रकला बऱ्यापैकी जमलेली होती', इंद्रजित म्हणाला. मेसोलिथिक काळात म्हणजे इ.पूर्व १२,००० ते २,५०० वर्षांपर्यंत भीमबेटकामध्ये आदीमानवाची वस्ती असावी असा शास्त्रज्ञांचा कयास आहे. पण पुढे काही कारणामुळे ही साईट रिकामी झाली. कदाचित पाण्याचे दुर्भिक्ष्य झाले असावे असा कयास केला जातो. तेव्हापासून ह्या गुहा जगाच्या विस्मृतीत गेल्या त्या वाकणकरांनी परत जगापुढे आणेपर्यंत.
ह्या गुहा बघताना का कोण जाणे सतत माझ्या अंगावर काटा येत होता. कोण होते ते अज्ञात लोक ज्यांनी ह्या कलाकृती निर्माण केल्या? कसे दिसायचे ते? त्यांचे कपडे कसे होते? ते कुठली वाद्ये वाजवायचे? कुणाची गाणी गायचे? कुणाची उपासना करायचे? त्यांचे सण कसे होते? त्यांची दिनचर्या कशी होती? खूप प्रश्न मला सतावत होते. त्या विस्तीर्ण परिसरात फक्त मी आणि इंद्रजितच होतो. दोघेही आपापल्या विचारात होतो तरी मला वेगवेगळ्या आवाजांचे भास होत होते. इथे आपण रात्रीचा मुक्काम करावा. नुसत्या एका मेणबत्तीच्या उजेडात ह्या गुहा डोळे भरून बघाव्यात अशी तीव्र इच्छा माझ्या मनाला चाटून गेली पण ते अर्थातच शक्य नव्हतं. काही काळ तिथेच एका दगडावर बसून राहिले डोळे मिटून, ही चित्रे काढणारे आदिमानव कसे दिसत असतील, कसे रहात असतील ह्याचा विचार करत! जाता जाता इंद्रजितला विचारलं, 'मोदींनी नोटबंदी केली त्याचा तुला काही त्रास झाला का?' तो हसला आणि म्हणाला, 'हजाराची नोट मी कधी हातात सुद्धा धरलेली नाही, मला कशाला त्रास होईल? त्रास होईल तो तुमच्यासारख्या लोकांना'.
इंद्रजितला पैसे देऊन, त्याचा निरोप घेऊन भीमबेटकाहून निघाले. पुढचा मुक्काम होता भोजपूर. अष्मयुगातून आता मला एकदम अकराव्या शतकात उडी घ्यायची होती. बेटवा नदीच्या किनाऱ्यावर वसलेलं भोजपूर म्हणजे धारानगरीच्या भोजराजाची एकेकाळची राजधानी. हा राजा शूर तर होताच, पण अत्यंत विद्वान होता, रसिक होता, कवी होता. त्याने जवळजवळ ८० ग्रंथांची निर्मिती केली होती, त्यामध्ये सरस्वतीकंठाभरण हे व्याकरणावरचे भाष्य आहे, राजमार्तंड ही पतंजलीच्या योगसूत्रांवरची टीका आहे आणि समरांगण सूत्रधार हा वास्तुशास्त्रावरचा ग्रंथ आहे. अजूनही त्याचं नाव आदराने घेतलं जातं. 'कहां राजा भोज और कहां गंगू तेली' ही म्हण आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलीच असेल, तोच हा रसिकराज भोज. भोजराजाविषयी अशी आख्यायिका आहे की त्याने त्याच्या नगरीतल्या कालिदासा सारख्या कविश्रेष्ठाला समस्यापूर्तीसाठी 'ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:' ही अवघड ओळ दिली होती.
'भोजस्य भार्या मदविव्हलाया
कराच्युतं चंदनहेमपात्रं
सोपानमार्गे प्रकरोति शब्दम
ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:'
म्हणजे भोजराजाची पत्नी हातात चंदनाची आरती असलेले सुवर्णपात्र घेऊन शय्यागृहात जात असताना तिचा जिन्यात पाय अडखळला आणि हातातून पडलेले सुवर्णपात्र पायऱ्यांवरून गडगडत खाली येत असताना 'ठाठं ठठंठं ठठठं ठठंठ:' असा आवाज झाला, अशी ती समस्यापूर्ती कालिदासाने केली होती असे म्हणतात. हा कालिदास म्हणजे उज्जयनीचा मेघदूत रचणारा कालिदास नसून दुसरा कालिदास आहे असे जाणकारांचे मत आहे. ह्या भोजराजाला म्हणजे एक असाध्य चर्मविकार जडला होता. त्याला एका वैद्याने सांगितले की बेटवा नदीवर बांध बांधून झालेल्या सरोवरातल्या पाण्याने अंघोळ केली तर तुझा चर्मविकार दूर होईल. त्याप्रमाणे भोजराजाने केले व तो खडखडीत बरा झाला. ह्या आजारातून उठल्यानंतर ईश्वराप्रती कृतज्ञता म्हणून भोजराजाने हे भोजपूरचे भव्य शिवमंदिर बांधले अशी आख्यायिका आहे.
भोजपूरच्या मंदिरापाशी मी पोचले तेव्हा दुपारचे साडेअकरा वाजले होते. अकराव्या शतकात बांधलेले हे लाल दगडातले भोजेश्वर ह्या नावाने ओळखले जाणारे शिवमंदिर सूर्यप्रकाशात नुसते झळाळून निघालेले होते. ह्या मंदिराची खासियत म्हणजे इथले निव्वळ शिवलिंग तब्बल साडेसात फूट उंच आणि एकपाषाणी आहे. भोवतालचे योनीपीठ चौकोनी आहे आणि तेही जवळजवळ बावीस फूट व्यासाचे आणि एकाच दगडातून बनवलेले आहे. ह्या विशाल शिवलिंगाची चौथऱ्यासकट जमिनीपासूनची उंची जवळजवळ चाळीस फूट आहे. सामान्यतः आपल्याकडे मंदिर आधी बनवले जाते आणि मग गाभाऱ्यात देवाची प्राणप्रतिष्ठा होते, पण हे भोजपूरचे हे शिवलिंग इतके विशाल आहे की तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की इथे प्रथम लिंगप्रतिष्ठा केली गेली आणि मग भोवती मंदिर उभारले गेले. हे मंदिर आधी वरून उघडे होते. काही लोकांच्या मते हे मंदिर ध्यानमंदिर आहे आणि म्हणूनच ते वरून उघडे होते. पण आता पुरातत्व खात्याने पावसाच्या पाण्याने मंदिर खराब होऊ नये म्हणून वर फायबरचे छत उभारून मंदिर बंद केले आहे. मंदिराच्या मागे एक माती आणि दगडांनी बनवलेला एक रॅम्प आहे, जो मंदिर उभारणीच्या वेळी मोठमोठाले अवजड दगड वर नेण्यासाठी म्हणून बनवला गेला असावा. सामान्यतः मंदिर बांधून पूर्ण झालं की असे रॅम्प ठेवत नाहीत, ते पडून टाकतात, पण इथे हा रॅम्प अजून आहे, त्यामुळे एक समजूत अशी आहे की हे मंदिर बांधून पूर्ण झालंच नाही.
भोजपूरच्या मंदिरात जाऊन त्या भव्य शिवलिंगाचं दर्शन घेणं हा खरोखरच एक चित्तथरारक अनुभव आहे. भोजपूरच्या गावातच राहणाऱ्या एका वृद्ध गृहस्थांनी माझे गाईड होण्याची तयारी दर्शवली. त्यांना बरोबर घेऊन मी मंदिर बघत होते. तश्या मंदिरावर बाहेरच्या बाजूला फारच कमी शिल्पाकृती आहेत. महादरवाजाच्या दोन्ही बाजूला हातात कुंभ घेतलेल्या गंगा-यमुना आहेत. प्रवेशद्वारापाशी गंगा-यमुना कोरण्याचे कारण म्हणजे दर्शनाला येणाऱ्या भाविकांचे पापक्षालन व्हावे. शिखराच्या भोवती मात्र यक्ष आणि गंधर्वांच्या सुंदर ब्रॅकेट फिगर्स आहेत ज्यांनी शिखराचा गोलाकृती भाग तोलून धरलाय. हे मंदिर भोजराजाच्या काळात म्हणजे १००० ते १०५५ च्या दरम्यान बांधले गेले. दगड दगडाला जोडून लॉक अँड की पद्धतीने मंदिराचे बांधकाम केले गेले आहे. चुन्याचा वापर खूपच कमी आहे. भोजराजाच्या काळात इथे मंदिर स्थापत्याची कार्यशाळा असावी असे पुरातत्व शास्त्रज्ञांचे मत आहे, कारण मंदिराच्या परिसरात असलेल्या शिळांवर विविध प्रकारच्या मंदिरांच्या रेखाकृती काढलेल्या आहेत.
मंदिराच्या परिसरात थोडे दार चालून गेलो की बेटवा नदीचा हिरवागार प्रवाह दिसतो. काठावर अक्षरशः शेकडो प्रचंड शिळा इथेतिथे विखुरलेल्या आहेत. त्या सर्व शिळा बेटवा नदीवर भोजराजाने उभारलेल्या बांधाच्या होत्या. त्या बांधामुळे निर्माण झालेल्या विशाल सरोवराच्या काठावर एकेकाळी भोजपूरचे शिवमंदिर उभे होते. पुढे माळव्याचा सुलतान होशंगशहाने ह्याने पंधराव्या शतकात भोजपूरवर आक्रमण करून तो बांध तोडून टाकला आणि मंदिराचेही बरेच नुकसान केले, मूर्तींचा विध्वंस केला. मुसलमानी आक्रमणानंतर प्राचीन हिंदू मंदिरांचे जे काय होते तोच भोग भोजपूरच्या ह्या मंदिराच्या वाट्यालाही आला. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा हे मंदिर अत्यंत वाईट स्थितीत होते. भारतीय पुरातत्व खात्याने अत्यंत परिश्रमपूर्वक ह्या मंदिराचं पुनर्वसन केलंय.
भोजपूरच्या ह्या मंदिरातलं शिवलिंग इतकं भव्य आहे की वर चढून पिंडीला बेल वाहायला शिडी लावावी लागते. माझ्याबरोबरचे ते वृद्ध गृहस्थ म्हणाले की आधी कुणालाही पिंडीवर चढून फुले वाहता येत होती, पण राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा जेव्हा ह्या मंदिरात दर्शनाला आले होते तेव्हा त्यांनी विचारलं की आलेल्या कुणालाही असं पिंडीवर चढायची परवानगी का देतात, तेव्हापासून फक्त इथले पुजारी सकाळी एकदाच पिंडीवर चढून बेल वहातात.
मंदिर बघून बाहेर आले. हातातली पाण्याची बाटली खाली ठेवून मी मंदिराचे फोटो काढत होते, तेव्हढ्यात मंदिर बघायला आलेल्या एका मोठ्या कुटुंबातली एक चिमुरडी लुटूलुटू येऊन ती पाण्याची बाटली उघडायचा प्रयत्न करू लागली. तिला तहान लागली असावी. मी कदाचित रागावेन म्हणून तिच्या आईने लगेच तिला मागे ओढले आणि दटावणीच्या स्वरात म्हटले, 'हात मत लगाना बेटा, वो पानी अपना नही है'. मी पाण्याची बाटली उघडून त्या मुलीच्या हातात देत तिच्या आईला म्हटलं की, 'पीने दीजिये ना बच्चीको पानी. कोई बात नही'. हे सगळं संभाषण ऐकत असलेले माझ्याबरोबरचे ते म्हातारे काका त्या मुलीच्या आईला म्हणाले 'बेटा, पानी पानी होता है, अपना या पराया नही होता'. माझ्या मनात आलं, किती कमी शब्दात आपल्या संस्कृतीचं सार सांगून गेले होते ते काका!
मंदिरात दर्शन घेतल्यानंतर मी मंदिरापासून थोडं दार एएसआयने एक छोटं संग्रहालय उभं केलंय तिथे गेले. तिथे मंदिराचे जुने फोटो आणि मॉडेल्स ठेवलेली आहेत. बाहेर जुन्या देवळांचे शेकडो अवशेष असेच जीर्ण, भग्न अवस्थेत पडलेले आहेत. ते पाहताना असं वाटतं की ह्या परिसरात पूर्वी अनेक मंदिरे असावी. मी त्या संग्रहालयात गेले तेव्हा दुपारची वेळ होती. चौकीदार बाजूला एका झाडाखाली निवांत झोपला होता, आणि तिथेच पलीकडे त्या प्राचीन मंदिरांच्या अवशेषांच्या राशीवर बसून एक तरुण जोडपं गुजगोष्टी करत होतं. मागे बेटवा नदीचं पात्र दिसत होतं. सगळीकडे तो जुन्या दगडांचा खच आणि एका होडीत बसून मासे पकडणारा एक माणूस. बाकी सगळं शांत होतं. एकेकाळी हाच परिसर किती गजबजून गेलेला असेल! पूजेचे मंत्र, संगीत, ही मंदिरे बनवणाऱ्या कलाकारांच्या छिन्नी हातोड्याचे घाव ह्यांच्या आवाजाने हा संपूर्ण परिसर निनादत असेल. आज मात्र भोजपूरच्या त्या मंदिराच्या विस्तीर्ण परिसरात एक विचित्र, खिन्न शांतता होती. बाहेर अस्ताव्यस्त पडलेले ते हजार वर्षांपूर्वीचे शिलाखंड बघताना का कोण जाणे माझ्या उदास मनात कुसुमाग्रजांच्या मातीची दर्पोक्ती ह्या कवितेतल्या ओळी रेंगाळत होत्या,
'कित्येक शिकंदर जग जिंकुनिया गेले
कित्येक वाल्मिकी अखेर इकडे आले
कित्येक मनू अन् मुनी धुळीने गिळले
स्मृतितीलहि त्यांच्या ओळी अंधुक होती
शेकडो ताजही जिथे शोभले काल
ती प्रचंड नगरे आज आमुच्या पोटी
मातीवर चढणे एक नवा थर अंती !’
- शेफाली वैद्य