पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटी विरुद्ध लढा देऊन वसईचा किल्ला नरवीर चिमाजी आप्पा यांनी जिंकल्याच्या घटनेला यावर्षी २७९ वर्षे पूर्ण होत आहेत. गेली सात वर्षे वसई-विरार महानगरपालिकेतर्फे १३ मे हा दिवस ’वसई विजय दिन’ म्हणून साजरा केला जातो. मात्र यावेळी अचानक एका समाजातील लोकांना पोर्तुगिजांचा जणू पुळकाच आला. पोर्तुगिजांचा पुळका आलेल्यांनी विजयोत्सवाच्या कार्यक्रमांमुळे समाजात दुही निर्माण होते, असे बिनबुडाचे आरोप करत यावर बंदी घालण्याची मागणी केली आहे. मात्र ही मागणी एवढी पोकळ आहे की, मागणी करणार्या समाजाच्या लोकांमध्येच याबद्दल मतभेदही झालेत.
दि. १०, १३ आणि १४ मे रोजी वसईमध्ये हा विजयोत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र, यावेळी नरवीर चिमाजी आप्पा यांनी दिलेल्या लढ्याबद्दल आणि पोर्तुगिजांच्या जुलमी राजवटीबद्दल सोशल मीडिया आणि समाजमाध्यमांमध्ये मजकूर प्रसिद्ध केला होता. यावरच आक्षेप घेत समाजशुद्धी अभियानाच्या कार्यकर्त्यांकडून याला विरोध करण्यात आला आहे. समाजात दरी निर्माण होण्याचे कारण पुढे केले असले तरी गेली सात वर्षे हा विरोध का होत नव्हता आणि अचानक महोत्सव तोंडावर आल्यावरच हा विरोध कसा, प्रश्नही निर्माण झाला आहे. पोर्तुगिजांचा अमानुषपणा सर्वांनाच ठाऊक आहे. एखादवेळ इंग्रज परवडले, पण पोर्तुगीज नको, अशी परिस्थिती त्यावेळी होती. मात्र, असे असतानाही पोर्तुगीज क्रूर, अत्याचारी आणि रंगेल असल्याचे चित्र सर्व निर्माण करत असल्याचे सांगत याला उघडपणे विरोध करण्यात येत आहे. वास्तविक पाहता पोर्तुगीज, मुघल, इंग्रज हे परकीय आक्रमकच होते. त्यांनी सत्ता, धर्म आणि व्यापारासाठी भारतावर आक्रमण केले, या इतिहासाकडे डोळेझाक करता येणार नाही. देशाला अनेक दशके लुटणार्या, ओरबाडणार्या या हैवानांचा संतापाऐवजी अचानक आज काहींना हेवा वाटू लागलाय आणि त्यामुळे समाजात तेढ निर्माण होण्यासारखे प्रश्न तोंड वर काढू लागले आहेत. जर आज परके पोर्तुगीज जवळचे वाटू लागले आहेत, तर येत्या काळात या लोकांचे इंग्रज प्रेम जागे झाले, तर स्वत:चे अस्तित्व आणि स्वत:ची देशाशी जोडलेली नाळ विसरून १५ ऑगस्टलाही विरोध केला जाणार का? हा प्रश्न निर्माण होतो. व्यक्ती कोणत्याही जातीधर्माचा असला तरी आपण परकीयांची बाजू घेताना आपण भारतीय असल्याचे विसरून चालणार नाही.
हे पूर्वनियोजित षड्यंत्र तर नाही ना?
आज वसईत साजरा करण्यात येणारा विजयोत्सव हा वरवरचा दिखाऊपणा नसून ते एक पूर्वनियोजित षड्यंत्र तर नाही ना, असा प्रश्न आता या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे. सर्वसमावेशक विविध उपक्रमांना कोणत्या ना कोणत्या कारणाने विरोध करून आपले व्यक्तिगत आणि राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्याचे हिकमती पर्याय गेली अनेक वर्षे पाहायला मिळत आहेत. याला यावर्षी जोड देण्यात आली ती विजयोत्सवाची. समाजसेवा, सामाजिक जाण, सामाजिक चळवळ अशा नावांखाली सामाजिक, जातीय आणि धार्मिक तेढ निर्माण करण्याचे राजकारण काही समाजकंटकांमुळे वसईकरांच्या अंगवळणी पडले आहे. मात्र, नको त्या गोष्टीचे राजकारण करत एकोपा आणि सलोख्याचे वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न काही व्यक्तींकडून केला जात आहे. दोन समाजांमध्ये तेढ निर्माण करणार्या या उत्सवांवर बंदी घालण्याची छुपी आणि राजकीय मागणी जरी होऊ लागली तरीही धर्माच्या नावावर विरोध करणार्यांनी आपण एकाच देशात जन्मलो आणि आपल्या शरीरात वाहणारे रक्तदेखील लालच आहे, हे विसरून चालणार नाही. आज अशा प्रकारच्या होणार्या मागण्यांमुळे वसईच्या ऐतिहासिक परंपरेला आणि धार्मिक सलोख्याला तडा जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. कोणत्याही विजयोत्सवात जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून त्याचा विचार करणे गरजेचे आहे. जाती-धर्माच्या डोळ्यांवरच्या पट्ट्या काढून यामधून राष्ट्रप्रेम जोपासणे महत्त्वाचे आहे. त्याचप्रमाणे वसईत साजरा होणारा हा विजयोत्सव कोणत्याही जातीधर्माचा किंवा पक्षाचा नसून तो समस्त वसईकरांचा आहे. आज अशाच गोष्टींचा हात धरून जर कोणी वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न करत असेल, तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष करत सामाजिक बांधिलकी आणि एकोपा जपण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. गेली अनेक वर्षे वसईमध्ये हा विजयोत्सव साजरा करण्यात येत आहे. मात्र, एवढी वर्षे हा उत्सव साजरा केल्यानंतर अचानकच त्यातून धार्मिक भावना दुखावल्याचा आव येणे, हे काही पटण्यासारखे नाही. पोर्तुगिजांनी भारतीयांचा धार्मिक छळ तर केलाच होता. धर्मांतरण केल्यानंतरही ते स्थानिकांना ‘नेटिव्ह’ म्हणून वेगळा दर्जा देत होते. अशा या जुलमी राजवटीचा अचानक पुळका का? डोळसपणे मानवतावादी दृष्टिकोनातून या गोष्टींची माहिती घेणे गरजेचे आहे. हा विजयोत्सव वसईतील सामाजिक एकोप्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कोणतीही व्यक्ती या विजयोत्सवात सहभागी झाल्याशिवाय राहणार नाही.
- जयदीप दाभोळकर