अंदाजे १९३३चा काळ. सुपे, सासवड. पुण्यातील एक खेडेगाव. या खेडेगावामध्ये अंदाजे ३०-४० घरांचा एक महारवाडा. या महारवाड्यातील जगतापांच्या घरी नामदेवचा जन्मझाला. त्याकाळी अस्पृश्यता पद्धत तशी जोरातच होती. गावकी, तराळकी, महारकी अशा विविध पद्धतींनी आणि नावांनी ती अस्तित्वात होती. गावात एखादं ढोर मेलं की, महारांनी त्याला वेशीबाहेर घेऊन जायचं. लहानग्या नामदेवने हे सारं काही अनुभवलं होतं. या सार्या प्रथा आणि पद्धती डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांमुळे, चळवळीमुळे, संघर्षामुळे बंद झाल्या. या संपूर्ण क्रांतिकारक प्रवासाचा नामदेवची पिढी साक्षीदार होती. नामदेव त्यावेळची सातवी, जी एसएससीच्या समकक्ष मानली जायची ती पास झाला. जर आपल्याला आपलं घर सुधारायचं असेल, तर आपल्याला शहराशिवाय गत्यंतर नाही, हे नामदेवने जाणलं आणि तो पुण्यात आला.
दरम्यान, तारुण्यात आलेल्या नामदेवचं एका वर्षाने मोठ्या असलेल्या एका मुलीवर प्रेम जडलं. घरात त्याने त्या मुलीसोबत लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मात्र, त्याकाळी प्रेमविवाह ही संकल्पना आजच्या इतकी पुढारलेली नव्हती. साहजिकच घरच्यांनी नकार दिला. मात्र, घरच्यांच्या विरोधात जाऊन नामदेवने शारदासोबत विवाह केला आणि दोघेही पुण्यात आले. शारदा पेशाने शिक्षिका होती. पुणे महानगरपालिकेत ती शिक्षिका म्हणून रुजू झाली. नामदेव आणि शारदा हे दोघे पुण्यात एका भाड्याच्या घरात राहू लागले. या दाम्पत्याला ३ मुलं आणि ३ मुली झाल्या. सोबतच शारदाची आई, ३ बहिणी आणि भाऊ सुद्धा राहू लागले. कुटुंब मोठ्ठं होतं. या मोठ्या कुटुंबाला सांभाळण्यासाठी नामदेव पडेल ती कामे करायचा. पुण्याच्या रतन टॉकिजसमोर पुस्तकं विक, गणेशोत्सवाच्या काळात पाट विक, ५ रुपये दराने कुणाचं घर चुन्याने रंगवून दे, असं काही ना काही नामदेव कामकरत होता आणि घरखर्च भागवत होता. निर्व्यसनी, प्रामाणिकपणा आणि कष्टाळू हे गुण त्याची बलस्थानं ठरली होती. त्यामुळे तो ज्यांच्या सान्निध्यात यायचा, त्यांचा विश्वास आपोआप संपादन करायचा.
याच काळात नामदेवने इलेक्ट्रिशियनचा मोटर रिपेअरिंगचा एक कोर्स केला होता. १९६० साली उरळीकांचनला डॉ. मणिभाई देसाई नावाचे सद्गृहस्थ होते. हे डॉक्टर भारतीय ऍग्रो इंडस्ट्रीज फाऊंडेशन नावाची संस्था चालवायचे. तो काळ हरितक्रांतीचा होता. संपूर्ण देशात हरितक्रांतीचा नारा बुलंद झालेला. सरकार उपसा सिंचनासाठी अर्थसाहाय्य करत असे. देसाईंची संस्था हे उपसासिंचनाचे काम करत असे. नामदेव जगताप देसाईंसोबत काम करू लागले. उपसा सिंचनासाठी सिमेंटचे पाईप्स लागत असे. त्यावेळी सांगली जिल्ह्यात हे पाईप तयार होत असत. नामदेव हे पाईप सांगलीवरून आणत आणि पुण्यातील शेतकर्यांना जोडून देत. या कामामुळे अनेक शेतकर्यांशी चांगले संबंध निर्माण झाले होते. शेतकर्यांना शेतीची अवजारे लागायची ती तयार करण्यासाठी नामदेवने ‘असू. इंजिनिअरिंग’ नावाने वर्कशॉप सुरू केले. त्याकाळी सगळी अवजारे हाताने तयार केली जायची. नामदेवरावांनी वेल्डिंग, लेथ, टर्नर सारख्या मशीन्स आणल्या. त्यावर ते अवजार तयार करत आणि संपूर्ण पुणे जिल्ह्याला ते पुरवठा करत.