दहशतवादाविरूद्ध लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक : मुख्यमंत्री

    26-Nov-2017
Total Views |
 
 
मुंबई : दहशतवादाविरूद्ध लढाईत सामान्य नागरिकांचा सहभाग आवश्यक असून प्रत्येक नागरिकाने जागरूक राहून सुरक्षा दलांसाठी डोळे व कान बनून काम केल्यास देशाच्या सुरक्षेला कधीच धोका पोहचणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. राष्ट्रीय सुरक्षा जागरण मंच आणि बॅाम्बे स्टॉक एक्सचेंज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २६/११ हल्ल्यातील शहीदांना मानवंदना देण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमात केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल कार्यकारिणी सदस्य इंद्रेश कुमारलेफ्टनंट जनरल विश्वंभर सिंहराष्ट्रीय सुरक्षा जागरण मंचच्या रेश्मा जैन व इतर मान्यवर उपस्थित होते.
 
 

 

२६/११ हा देशाच्या हृदयावरील कधीही न मिटणारा व्रण आहे. ज्याप्रमाणे ९/११ मधील ट्विन टॅावरचा हल्ला हा आर्थिक महासत्तेवरचा हल्ला होता त्याचप्रमाणे मुंबईवरील हल्ला म्हणजे देशाच्या आर्थिक केंद्रस्थानावरील हल्ला होता असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या हल्ल्यात लक्षात आलेल्या सुरक्षा यंत्रणांमधील त्रुटी पूर्ण करण्यासाठी राज्य तसेच केंद्र शासनाने आश्वासक पावले उचलली आहेत. एनएसजीच्या धर्तीवर राज्यात फोर्स वनची स्थापना करण्यात आली. अत्यंत सुसज्ज अशी उपकरणं आणि प्रशिक्षणाद्वारे हा फोर्स वन कार्यान्वित करण्यात आला आहे. समुद्री सीमेच्या सुरक्षेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मच्छिमारांच्या बोटींना कलरकोडींग करण्यात आले आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. एखादी अनोळखी बोट आढळल्यास त्याबाबत तात्काळ कार्यवाही होऊन सुरक्षेसंदर्भातील धोका दूर करण्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे. ज्याठिकाणी मनुष्यबळाद्वारे सुरक्षा देता येणे शक्य नाही अशा परिसरातील नागरिेकांना वेळीच धोक्याचा इशारा देण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे असे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

 
याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की, मुंबई पोलिसांकडे सर्वात आधुनिक अशी कंट्रोल रुम आहे. फक्त एका वर्षभरात संपूर्ण मुंबईत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून कंट्रोल रुमद्वारे संपूर्ण मुंबईवर एकाच वेळी सर्व ठिकाणी लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. मुंबईतील अतिवृष्टीच्या काळात शहरातील वाहतूक नियंत्रित करणे व इतर बाबींवर काम करता आले. पोलिसांना केवळ बुलेट प्रुफच नव्हे तर बुलेट रेजिस्टेंट जॅकेट्स देण्यात आले. या जॅकेटद्वारे शक्तीशाली शस्त्रातील बुलेट दहा मीटर अंतरावरुनही रोखता येते. गुप्तचर यंत्रणेवर अधिक काम करण्यात आले. यासाठी समन्वय समिती नेमून नियमित आढावा घेण्यात येतो. सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक माध्यमांची मदत घेऊन समुपदेशन करुन आतंकवादी संघटनांमध्ये जाऊ शकणाऱ्या युवकांना रोखण्यात मोठ्या प्रमाणात यश आले आहे असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला. केवळ शहीदांना स्मरण करण्याचा हा दिवस नसून आजच्या दिवशी देशाच्या सुरक्षेसंबधी सतर्कता व तयारीचा आढावा घेण्याचा हा दिवस आहेअसे सांगून मुख्यमंत्र्यांनी सर्व शहीदांना श्रद्धांजली वाहिली.
 
 
देशांतर्गत व सीमेवरील सुरक्षेसंदर्भात उल्लेखनीय कार्य होत असून नक्षली कारवाईचे  प्रमाण २० ते २२ टक्के कमी झाले आहेअसे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सांगितले. ते पुढे म्हणालेमहाराष्ट्राने मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्यातील सुरक्षेसंदर्भात फार चांगले काम केले आहे. समुद्रीमार्गाद्वारे होणाऱ्या सुरक्षेत कडक पावले उचलली आहेत. त्याचप्रमाणे डिजिटल व सायबर सुरक्षेसंर्दभातील चांगले काम केले आहे. सर्वोत्कृष्ट नवीन बनावटीची उपकरणंआधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध व्हावे यासाठी लागणारा आवश्यक निधी केंद्रामार्फत कमी पडू दिला जात नाही. दरम्यान आज संविधान दिवस आहे. कोणताही आतंकवाद हा लोकशाही विरोधातील युद्ध आहे. देशविघातक कार्यवाहीला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने स्वत:ची जबाबदारी ओळखून सतर्कतेने कार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.