पुढची पीढी म्हणजे तुम्ही नाही तर 'त्यांची' पीढी! फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्त्र
30-Apr-2024
Total Views |
सोलापूर : पुढची पीढी म्हणजे तुम्ही नाही तर त्यांची पुढची पीढी आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केली आहे. मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत माढा लोकसभेचे भाजपा उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ माळशिरस येथे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मध्यंतरीच्या काळात सोलापूरमध्ये शरद पवार, सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे एकत्रित आले आणि सांगितलं की, आम्ही पुढच्या पिढीच्या भविष्याकरिता ३० वर्षांनी एकत्र आलो आहोत. पण ही पुढची पिढी म्हणजे तुम्ही नाही तर शरद पवार सुप्रियाताईंच्या भविष्यासाठी, सुशीलकुमार शिंदे त्यांच्या मुलीच्या भविष्याकरिता आणि विजय मोहिते हे धैर्यशिल मोहितेंच्या भविष्याकरिता एकत्रित आले आहेत."
"ज्यांना ५०-६० वर्ष आपण नेतृत्व दिलं ते प्रत्येक निवडणूकीमध्ये तिच ती भाषणं आणि त्याच त्या घोषणा करायचे. परंतू, ते कधीही पूर्ण झालेलं नाही. पण पहिल्यांदा रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मोदीजींसोबत पाठवल्यानंतर याठिकाणी पाणी आणि रेल्वे आली. आता ३६ गावांच्या पाण्याचा प्रश्नही लवकरच सुटणार आहे," असे आश्वासन त्यांनी दिले.
पुढे ते म्हणाले की, "रणजितदादांच्या विरोधात जे उभे आहेत त्यांचा इतिहास बघा. या तालुक्याला त्यांच्या दहशतीतून मी मुक्त करणार आहे. सामान्य माणसाच्या बळकावलेल्या जमिनी, लोकांवर झालेले हल्ले आता सहन केले जाणार नाही. ही लोकशाही आहे, ठोकशाही नाही. त्यामुळे इथे अशा प्रकारची ठोकशाही चालू दिली जाणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.