काव्यरसिक मंडळात 'एक रात्र कवितेची' उत्सव उत्साहात साजरा

    29-Apr-2024
Total Views |
 
मुंबई : काव्यरसिक मंडळ, डोंबिवली हे एक कवितेचे विद्यापीठ स्थानिक कलाकारांकडून समजले जाते. येथे कवितेमागचे व्याकरण, दोन ओळीं मधला संवाद याचा उहापोह होतो, आणि उत्तम कवितांचे प्रस्तुतीकरणही होते. डोंबिवली शहराने जशी गुढीपाडव्याची शोभायात्रा प्रथम सुरू केली, त्याचप्रमाणे काव्यरसिक मंडळ, डोंबिवली यांनी 'एक रात्र कवितेची!' हा कवितेचा जागरही डोंबिवलीत प्रथम सुरू केला. आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
 
ek ratra kavitechi
 
27 एप्रिल रोजी 'एक रात्र कवितेची!' हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी तब्बल 52 कवींनी नावे नोंदविली होती. त्यात नासिक, मुंबई, नवी मुंबई, भाईंदर पासून अनेक कवी आले होते. यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष, आघाडीचे कवी- लेखक श्री किरण येले आणि प्रमुख पाहुणे प्रसिद्ध ज्येष्ठ गझलकार प्रशांत वैद्य, आणि सावंतवाडीचा मालवणी चेहरा दादा मडकईकर हे लाभले होते.
मंडळाच्या सचिव दयाताई घोंगे, यांनी सुरुवातीचे सूत्रसंचालन केले. दीप प्रज्वलनानंतर अध्यक्षा उज्ज्वला लुकतुके यांच्या हस्ते, अध्यक्ष व पाहुण्यांचा सत्कार झाला. त्या अध्यक्ष किरण येले यांची ओळख करून देताना म्हणाल्या, "प्रत्येक कवी संवेदनशील असतोच पण ही संवेदना जेव्हा त्यांच्या कृतीत दिसते तेव्हाच, ह्या हृदयीचे बोल त्या हृदयापर्यंत पोहोचतात! किरणजी येले हे याच प्रकारातले साहित्यिक आहेत. त्यांनी कोरोना काळात स्वतः झाडे लावून, उद्यान तयार केले आणि प्राथमिक शाळेतील मुलांशी संवाद साधून त्यांना दिशा दाखवली."
 
त्यानंतर किरण येले यांनी आम्ही चिल्लर सुटे पैसे भुक्कड, तुम्ही बंद नोटा फक्कड!, बाई नखे वाढवते पण आयुष्यभर फक्त रंगवत राहते! तसेच 'सीतेने खूप पत्रे लिहिली होती भूर्जपत्रांवर, अग्नी परीक्षेच्या आदल्या रात्री! वगैरे कविता वाचून रसिकांची वाहवा मिळवली.
पुढे अनौपचारिकरित्या सर्वांच्या कविता सादर झाल्या. चहापानासाठी विश्रांती घेऊन दुसऱ्या फेरीला सुरुवात करताना, जयंत कुलकर्णी यांनी "मै तो अकेले मजे मे था, मुझे आप किस लिये मिल गये? या मजरहू सुलतानपुरी यांच्या शेराने, श्रेष्ठ गजलकार प्रशांत वैद्य या आमंत्रित पाहुण्यांची ओळख करून दिली. त्यांच्या सगळ्या गझल खूप भाव खाऊन गेल्या. "जुने किती अन नवे किती, या शहराला तडे किती?
सांग उजेडा तुझ्या मध्ये, सूर्य किती काजवे किती?
तसेच "मनात माझे नाव तुझ्या पण अधरी नाही.
तुझ्या एवढा पाऊस सुद्धा लहरी नाही" वगैरे अप्रतिम गझल सादर केल्या. यानंतर कवींनी दुसऱ्या कवींच्या कविता वाचायच्या होत्या. ही फेरी अत्यंत बहारदार होती.
 
त्यानंतर पाहुणे कवी दादा मडकईकर यांच्या अध्यक्षतेखाली तिसरी फेरी रंगली. आनंद पेंढारकर यांनी त्यांचा परिचय करून देताना स्वतःच्या मालवणी कवितांना क्लासिकल गाण्याच्या चाली लावून म्हणणे आणि फड जिंकणे, हे त्यांचे वैशिष्ट्य अधोरेखित केले तसेच त्यांनी मालवणी शब्द आणि म्हणी संकलित केल्या आहेत वगैरे माहिती दिली. दादा मडकईकर यांनी "पळस फुललो रानात, पळस फुललो मनात!... चांदण्याची फुला खोल खोल दरीत गो".. वगैरे कविता म्हणून रसिकांची मने जिंकली.
उपस्थित असलेल्या प्रत्येक कवीला उत्तम दाद मिळत होती. तरीही लक्षात राहिलेली काही नावे सांगत आहे. नाशिकहून आलेले श्री नंदन रहाणे यांची गवळण, अध्यक्षा उज्वला लुकतुके यांची बहिणाबाई वरील कविता, निशा काळे यांची 'भय', मृणाल केळकर यांची चाल लावून सादर केलेली महानोर यांची कविता.
 
याचबरोबर मेघना पाध्ये, विजय जोशी, आनंद पेंढारकर, हेमंत राजाराम, जयंत कुलकर्णी, महेश देशपांडे, कल्याणचे योगेश वैद्य, दया घोंगे, विजय बेंबाळकर, अंजली बापट, मगदूम मॅडम, मेघना पाटील, सानिका गोडसे, वैदेही जोशी, प्रज्ञा कुलकर्णी, स्वाती भाट्ये, संदीप मर्ढेकर, वर्षा पाटील, संगीता पाखले, वैभव वऱ्हाडी, जितेंद्र लाड विशाल राजगुरू, राजेश देवरुखकर, सुधीर चित्ते, मनोज मेहता, पंकज जावळेकर, संदीप कळंबे,भाईंदरचे नमाई, रवींद्र सोनावणे, कल्पना गवरे, सखाराम आचरेकर, नागेश नायडू, विलास वाव्हळ, रवींद्र पाटील, हर्षल आचरेकर, अश्विनी म्हात्रे, प्रमोद पाटील, राजेश देवरुखकर, सखाराम आचरेकर, सुरेखा मालवणकर, नागेश नायडू, रवींद्र पाटील, संदीप कळंबे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.