लखनऊ : १७ जुलै रोजी सोनभद्र जिल्ह्यातील उम्भा गावामध्ये १० जणांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. या हत्याकांडानंतर उत्तरप्रदेशमध्ये राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच काँग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी पीडित कुटुंबाला भेट देण्याचा हट्ट धरून या गावात आणखीन तणाव निर्माण केला आहे. येथील परस्थिती हाताबाहेर जाऊन नये म्हणून पोलिसांनी प्रियांकाचा ताफा अडवला. मात्र परिस्थितीचे गांभीर्य नसल्याने प्रियांका आणि त्यांचे समर्थक धरणे धरून बसल्या आहेत. त्यामुळे येथील परस्थिती आणखीन बिघडत चालली असल्याची उत्तर प्रदेश पोलिसांचे म्हणणे आहे.
उम्भा गावात नेमकं काय घडलं ?
१७ जुलैला सोनभद्र जिल्ह्यातील मूर्तिया ग्रामपंचायत क्षेत्रातील उम्भा गावामध्ये जमिनीच्या वादातून दोन गटामध्ये अंधाधूंन गोळीबार झाला. यात दहा जणांना आपला जीव गमवावा लागला. तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी की, माजी आयएएस अधिकारी प्रभात कुमार मिश्रा यांनी ३० वर्षांपूर्वी मूर्तिया ग्रामपंचायत क्षेत्रात ९० एकर जमीन विकत घेतली होती. या जमिनीचा वाद अनेक दिवसांपासून चालू असताना या आयएएस अधिकाऱ्याने स्थानिक नेत्यांना सोबत घेऊन बळकावत आपल्या नावे करून घेतली होती. परिसरातील गोंड आदिवासी जमातीच्या लोकांचा या जमिनीवर १९४७ पासून कब्जा असल्याचे सांगितले जात असतानाही मिश्रा यांनी ही जमीन आपल्या सोसायटीच्या नावे करून घेतली.
मिश्रा कुटुंबीयांनी हीच जमीन या गावचा सरपंच यज्ञदत्त भूरिया याला काही दिवसांपूर्वी विकली होती. या जमिनीची किंमत ४ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. जमिनीचा ताबा घेण्यासाठी भूरिया १० ते १२ ट्रॅक्टर आणि हत्यारबंद गुंडांसह आला होता. गावातील गोंड आदिवासी व भूरिया यांच्यामध्ये भांडणे होऊन याचे रूपांतर गोळीबारामध्ये झाले. भूरियाच्या गुंडानी केलेल्या बेछूट गोळीबारात १० नागरिकांना आपला जीव गमवावा लागला तर २० जण गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी ७८ जणांवर गुन्हे दाखल केले असून २९ गुन्हेगारांना अटक करण्यात आली असल्याची माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat