नवी दिल्ली : २०१९च्या लोकसभा निवडणुकीसाठी दिल्ली कोण जिंकणार याकडे साऱ्या देशाचे लक्ष आहे. भाजपला आव्हान देण्यासाठी आता आप-कॉंग्रेसने एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, अजूनही दोघांचे बऱ्याच मुद्द्यावर एकमत झालेले नाही. दरम्यान, काँग्रेसने अद्याप दिल्लीत उमेदवार घोषित न केल्याने इच्छुक उमेदवारांचाही जीव टांगणीला आहे. मात्र, भाजपने आपले चार उमेदवार घोषित केले असून काँग्रेसला धक्का दिला आहे.
चांदनी चौक येथून डॉ. हर्षवर्धन, उत्तर पूर्व दिल्लीतून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतून रमेश बिधूडींना लोकसभेसाठी तिकीट देण्यात आले आहे. या शिवाय, पंजाबच्या अमृतसर आणि उत्तर प्रदेशातील घोसीमधूही उमेदवारांची यादी भाजपने जाहीर केली आहे. अमृतसरमधून उत्तर प्रदेशातील भाजपचे राज्यसभा खासदार हरदीप पुरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
२०१४ मध्ये अमृतसरहून अरूण जेटली यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. तर घोसीमधून हरिनारायण राजभर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपने दिल्लीतून चार विद्यमान खासदारांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यासाठी २३ एप्रिल ही शेवटची तारीख असणार आहे. पण, काँग्रेसने अद्यापही आपले उमेदवार घोषित केले नसल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये संभ्रम आहे. दरम्यान दिल्लीत काँग्रेसची ताकद असल्याचे म्हणत दिल्लीतील काँग्रेस नेत्यांनी आपशी आघाडी करण्यास नकार दिला होता. त्यामुळे दिल्लीत कोण जिंकणार याकडे आता सर्वाचे लक्ष लागले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat