नांदेड : पक्षात माझे पक्षात कुणीच ऐकत नाही, अशा शब्दांत शोक व्यक्त करतानाची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची ध्वनिफित चांगलीच व्हायरल होत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच व्हायरल झालेल्या या ध्वनिफितीने काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली असून, त्यात चव्हाण ‘मीही राजीनाम्याच्या विचारात आहे,’ असे म्हणतानाही दिसत आहेत.
सदर ध्वनिफितीतील संवाद अशोक चव्हाण आणि एका कार्यकर्त्यादरम्यानचा असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या वादाची त्याला पार्श्वभूमी आहे. काँग्रेसने चंद्रपूरातून माजी खासदार विलास मुत्तेमवार आणि बाळू धानोरकर यांच्याऐवजी विनायक बांगडे यांना उमेदवारी दिली आहे. यावरुन काँग्रेसमध्ये वाद लागला असून अशोक चव्हाण यांनी कार्यकर्त्याशी आपल्या मनातल्या भावना सामायिक केल्या आहेत.
दरम्यान, अशोक चव्हाण यांनी या ध्वनिफीतीतील विधान आपले असल्याचे कबुल केले नसले तरी, त्यांनी ते नाकारलेलेही नाही. एका वृत्तवाहिनीशी या ध्वनिफितीबाबत चव्हाण म्हणाले की, “कार्यकर्त्याशी झालेले ते माझे खासगी संभाषण आहे. तो पक्षाचा अंतर्गत विषय आहे. चंद्रपूरमध्ये अनेक वादाचे विषय आहेत. चंद्रपूरच्या उमेदवारीवरुन उद्भवलेल्या वादाची माहिती मी पक्षश्रेष्ठींच्या कानावर घातली आहे.” अशोक चव्हाण यांच्या या वक्तव्यांतून मात्र येत्या लोकसभा निवडणूकीत आधीच गटबाजीने गांजलेल्या काँग्रेसची अवस्था पाहण्यालायक असेल, हे स्पष्ट होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat