2007 साली दिल्ली ते लाहोर दरम्यान धावणार्या समझौता एक्सप्रेसमध्ये पानिपतजवळ बॉम्बस्फोट झाले होते. यात 70 जण ठार झाले होते. हा बॉम्बस्फोट स्वामी असीमानंद व त्यांच्या साथीदारांनी केला, असा आरोप लावून त्यांना अटक करण्यात आली. हे एक कारस्थान होते. परंतु, सोनिया गांधींना खुश करण्याच्या नादात सोनिया-दरबारातील लाचार, स्वत:चा आत्मा विकलेल्या खालमान्यांनी हे कारस्थान रचले. संयुक्त राष्ट्र संघाची सुरक्षा परिषद, अमेरिका आदींना, हा हल्ला पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी घडवून आणला, याबाबत तिळमात्रही शंका नव्हती. फक्त पाकिस्तान आणि भारतातील तत्कालीन सोनिया गांधी सरकार यांना मात्र हे मान्य नव्हते. त्यांच्यामते हा स्फोट हिंदू दहशतवाद्यांनीच घडवून आणला होता.
हे असले वातावरण त्यावेळच्या सोनिया सरकारला सहन झाले नाही. केवळ मुसलमानच नाही, तर हिंदूदेखील दहशतवादी असतात, असे सिद्ध झाले तर मुसलमानांविरुद्धचा जागतिक संताप निवळण्यास मदत होईल, असा ‘व्होट बँकीय’ विचार करून, 2010 साली या प्रकरणाला एक नवे वळण देण्यात आले. त्यानुसार, या स्फोटात मुसलमान सामील नसून, स्वामी असीमानंद व त्यांचे काही साथीदार सहभागी आहेत, अशी कहाणी रचण्यात आली आणि त्यानुसार असीमानंदांसह इतरांना अटक करण्यात आली. त्यांच्यावर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) खटला दाखल केला. त्या खटल्याचा निकाल या होळीच्या दिवशी लागला आणि असीमानंद व इतरांविरुद्ध कुठलाच पुरावा सिद्ध होऊ शकला नाही म्हणून या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. अशा रीतीने, हिंदू किंवा भगवा दहशतवाद सिद्ध करण्याचा सोनिया गांधींचा एक अत्यंत कुटिल डाव मातीत मिसळला. भारतमातेने सुटकेचा नि:श्वास टाकला असेल.
न्यायालयाच्या या निर्णयाने, दरबारी पत्रकार, इतिहासकार व बुद्धिवंत खवळले नसते तरच नवल! त्यांनी लगेच छाती बडविणे सुरू केले. असीमानंदांनी हा स्फोट घडवून आणला नाही म्हणजे हा स्फोट झालाच नसला पाहिजे. 70 जण मरण पावलेच नसले पाहिजे. इत्यादी अकलेचे तारे तोडणे सुरू झाले. या अशा प्रतिक्रिया देताना या मंडळींनी, 2010 पूर्वी या प्रकरणाला नवे वळण लावण्याआधी तपासाचे काय निष्कर्ष होते, याकडे सोयिस्करपणे दुर्लक्ष केले. ‘सिमी’च्या अतिरेकी शाखेचा प्रमुख सफदर नागोरी याने व त्याच्या काही साथीदारांनी नॉर्को-अॅनॅलिसिस परीक्षणात कबूल केले होते की, समझौता एक्सप्रेसमधील स्फोटात मुसलमान सहभागी आहेत. असे असतानाही, केवळ हिंदूंना बदनाम करण्यासाठी, इतकेच नव्हे, तर जगभरात मुसलमानांकडे बघण्याचा तयार झालेला एक संशयी दृष्टिकोन मवाळ व्हावा म्हणून, ‘हिंदू दहशतवादा’ची कल्पना हवेत सोडण्यात आली होती, हे आता सिद्ध झाले आहे. सोनिया दरबारातील अत्यंत विश्वासू अशा काही पाताळयंत्री प्रभावी व्यक्तींनी हे सर्व कारस्थान रचले होते. हे करताना, आपण या देशाचे, या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाचे किती नुकसान करीत आहोत, याचा थोडादेखील विचार यांच्या मनाला शिवला नसेल काय? आपल्या उदार मनोवृत्तीसाठी हजारो वर्षांपासून जगभरात प्रसिद्ध असलेल्या (आणि याच उदारमनस्कतेमुळे वारंवार संकटात सापडलेल्या) हिंदू समाजावर केवळ सत्ताप्राप्तीसाठी कायमचा कलंक लावण्यास यांना थोडीही लाज वाटली नाही!
सोनिया गांधींचे सरकार इतके पाताळयंत्री असतानादेखील, आपल्या खाजगी देवघरात देवासमोर तासन्तास नाक दाबून बसणारे, एरवी अत्यंत धार्मिक असल्याचा आव आणणारे अनेक हिंदू राजकीय नेते, पापमार्गाने कमविलेली आपली अफाट संपत्ती अबाधित राहावी म्हणून राजकीय वरदहस्त प्राप्त करण्यासाठी या बाईच्या मागे लाचारीने जाताना आपण आजही बघत आहोत. हिंदू समाजाची ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. राष्ट्रीय चारित्र्याचा लोप झाल्यामुळे या हिंदू समाजाला जे भोगावे लागले आहे आणि तो जे आजही भोगत आहे, तसे जगाच्या इतिहासात कुठेच घडले नसेल. इतके होऊनही, हिंदू समाजाचे डोळे उघडत नाहीत. हिंदू समाज असाच शेळपट असेल, तर मग गझनी, बाबरपासून ते इंग्रज आणि आता या बाई, यांचे काय चुकले म्हणायचे?
26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे या पोलिस अधिकार्याला दहशतवाद्यांनी ठार केले असतानाही, यात हिंदुत्ववाद्यांचाच हात होता, असे पुराव्यासह आरोप करण्यात आले होते. राज्याचे माजी पोलिस महानिरीक्षक शमसुद्दीन मुशरिफ यांनी ‘हू किल्ड करकरे?’ नावाचे 300 पानी पुस्तक लिहून, देशातील दहशतवादाचा खरा चेहरा हिंदुत्ववादीच असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला होता. कॉंग्रेसवाल्यांनी तर हे पुस्तक डोक्यावर घेतले होते. पण, नियती नेहमीच आपले फासे अदृश्यपणे फेकत असते. हे यांना कुणीतरी सांगायला हवे. म्हणूनच, इतका कांगावा करूनही हिंदूंना दहशतवादी ठरविण्याचा कट यशस्वी झाला नाही. भारताची नियती काही वेगळीच आहे.