मुंबई : काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होणाऱ्या मनधरणीला दाद न देता स्वबळावर लढण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी नुकतीच केली. भारिप बहुजन महासंघ आणि एमआयएम या दोन पक्षांच्या आघाडीचा प्रयोग करणारे प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील सर्वच्या सर्व ४८ जागांवर उमेदवार देण्याची घोषणा केली. आता ही निवडणूक लढवताना प्रकाश आंबेडकर यांनी भलतेच ‘प्रॅक्टिकल’ राजकारण करायचे ठरवल्याचे दिसत आहे. अगदी उमेदवारांच्या याद्या जाहीर करताना त्यांच्या नावांपुढे त्यांच्या जातीही ठळकपणे उल्लेख करून आपण राज्याच्या राजकारणाला कोणत्या दिशेने नेऊ इच्छितो, हेच प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आहे.
आघाडीकडून वंजारी, बौद्ध, धिवर, माना आदिवासी, माळी, बंजारा, धनगर, मुस्लिम, कैकाडी, मातंग, शिंपी, कोळी, विश्वकर्मा, वडार, होलार, कुणबी, लिंगायत, भिल्ल, वारली, मराठा, आगरी आदी बहुतांश समांजांना प्रतिनिधित्व दिल्याचे वंचित आघाडीला दाखवून द्यायचे आहे. उमेदवारांच्या यादीत सात डॉक्टर, तीन प्राध्यापक व दोन वकिल आदींचा सामावेश आहे. शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीने आपल्या ३७ उमेदवारांची पहिली यादी
जाहीर केली. प्रकाश आंबेडकर स्वतः लढण्याची शक्यता असलेल्या अकोला आणि सोलापूर या
दोन जागांबाबत यामध्ये काही घोषणा झाली नसली तरीही विदर्भापासून
मुंबई-कोकणापर्यंतच्या अनेक विभागांतील विविध ३७ उमेदवारांची यादी आंबेडकर यांनी
जाहीर केली आहे. हे करत असताना त्यांनी उमेदवारांच्या यादीच्या पत्रकात
उमेदवारांच्या नावांपुढे उमेदवारांच्या जातींचेही उल्लेख ठळकपणे करण्याचा प्रकार
केला आहे.
उघडउघड जातीचे राजकारण रूजवणार?
अनेक पक्ष कमीअधिक प्रमाणात जातीचे राजकारण करत असतात. या जातीला खुश कर, त्या जातीला प्रतिनिधित्व दे, या व अशा अनेक खेळ्या करून आपला सामाजिक आधार भक्कम करण्यासाठी राजकीय पक्ष व नेते प्रयत्नशील असतात. परंतु, अशाप्रकारे थेट उमेदवारांची यादी जाहीर करताना त्यांच्या नावापुढे जात लिहिण्याचा हा प्रकार विरळाच. यातून आपल्या ‘वंचित-बहुजन आघाडी’ असे नाव धारण करणाऱ्या राजकीय संघटनेची पुढची दिशा काय असणार, हेच प्रकाश आंबेडकर दाखवून देत असल्याचे राजकीय अभ्यासकांचे म्हणणे आहे.