कचऱ्यापासून वीजनिर्मितीकडे
मुंबई महानगरपालिकेने देवनार डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याची घोषणा केली आहे. येत्या दोन महिन्यांत या कामाची प्रक्रिया सुरू होईल, असेही सांगण्यात आले. या प्रकल्पापासून दररोज ४० किलोवॅट वीज तयार केली जाणार आहे, मात्र कोट्यवधींचा अर्थसंकल्प असलेल्या मुंबई महानगरपालिकेला हे उशिरा सुचलेले शहाणपण नेमके कधी आणि कसे पूर्णत्वास जाईल, याबाबत साशंकताच आहे. मुंबईमध्ये दररोज ७ हजार २०० टन कचरा जमा होतो, असे आकडेवारी सांगते. हा कचरा सध्या देवनार, मुलुंड आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जातो. त्यामुळे देवनारसह इतरही डम्पिंग ग्राऊंडच्या आसपासचा परिसर हा दुर्गंधी आणि आजारांनी ग्रासला आहे. राज्यात कचरा व्यवस्थापनाचा बोजवारा उडाल्यानंतर प्लास्टिकवर घातलेली बंदी हा तर वेगळाच विषयच. मात्र, मुंबई महानगरपालिकेवर इतकी वर्षे सत्ता उपभोगणाऱ्या शिवसेनेला कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्याचा केवळ प्रस्ताव काढण्याच्या निर्णयास येईस्तोवर इतका विलंब का लागला? मुंबईतील मोठ्या सोसायट्यांना पालिकेने कचरा वर्गीकरणाबाबत आधीच फटकारले आहे. मात्र, मुंबईतील झोपडपट्ट्यांचे काय? तिथल्या शौचालयांच्या प्रश्नाचे काय? घंटागाडी न पोहोचणाऱ्या भागातील वस्त्या, रेल्वे रुळानजीक फेकला जाणारा कचरा याची विल्हेवाट लावण्यात पालिका नेहमीच आखडता हात घेते. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर सुरू होणारा वीजप्रकल्प काही अंशी सकारात्मक पाऊल ठरेलही, मात्र आता प्रकल्प पुढे अजिबात न रखडता त्वरित मार्गी लागायला हवा. पालिकेच्या माध्यमातून जसे अनेक ठिकाणी कचऱ्यापासून खतनिर्मिती करण्याचे प्रकल्प राबविले जातात, तसेच या प्रकारच्या वीजनिर्मिती प्रकल्पांचीही त्यामध्ये भर पडली तर कचऱ्यासह वीजपुरवठ्याचा प्रश्नही काही अंशी मार्गी लागेल. कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्यासाठी पालिकेकडे पूर्णतः स्वतंत्र अशी यंत्रणा नाही. कंत्राटदाराच्या भरवशावर हा प्रकल्प चालेल. काही प्रमाणापेक्षा जास्त वीज मिळाल्यास ती पालिकेला मिळणार आहे. त्यामुळे कचऱ्यापासून वीज मिळवण्यापेक्षा त्याची विल्हेवाट लावण्याचा मनसुबा पालिका अधिकार्यांचा दिसतो. त्यातच मुंबईचा दीड हजार मेट्रिक टन कचरा टाकला जाणारे मुलुंड डम्पिंग ग्राऊंड दि. १ ऑक्टोबरपासून बंद होणार आहे. यातील एक हजार मेट्रिक टन कचरा देवनार डम्पिंग ग्राऊंडवर, तर ५०० मेट्रिक टन कचरा कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवर टाकला जाईल. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना हा प्रकल्प मात्र मुंबईकरांसाठी आशेचा किरण ठरु शकतो.