नवी दिल्ली : शिया पंथाचे विद्वान मौलाना कल्बे जावाद यांनी रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या विचारांचे समर्थन केले आहे. 'भविष्यातील भारत : संघाची दृष्टी' या विषयावर रा. स्व संघाचे दिल्लीतील विज्ञान भवन येथे तीन दिवसीय वैचारिक मंथन सुरू आहे. यावेळी रा. स्व संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत देशातील ३ हजार प्रतिष्टीत व्यक्तींसमोर संघाचे विचार मांडत आहेत. यावेळी मोहनजी यांनी एकता आणि सर्वसमावेशकतेचा विचार मांडला होता. या विचाराशी आपण सहमत असल्याचे मौलाना जावाद यांनी म्हटले आहे.
यावेळी मौलाना जावाद बोलताना म्हणाले की, "भारताला अशा प्रकारच्या कार्यक्रमांमुळे लाभ होईल. एकत्र राहुन हिंदु मुसलमान खुप पुढे जाऊ शकतात." समाजात आरएसएसची प्रतिमा उग्र तयार करण्यात आल्याचे देखील त्यांनी मान्य केले. दरम्यान, "संघ जेव्हा ‘हिंदुराष्ट्र’ म्हणतो, तेव्हा त्यामध्ये मुसलमान किंवा इतर समाज नकोत असे अजिबात नाही. ज्याक्षणी कोणी म्हणेल की या देशात मुसलमान नकोत, तेव्हा ते हिंदुत्व राहणार नाही. कारण हिंदुत्व हे मुळातच ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्व सांगणारे आहे." असे मोहनजी भागवत यांनी या कार्यक्रमात आपले मत व्यक्त केले होते.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/