केरळ : केरळमध्ये पावसाने अक्षरश: थैमान घातले असून येथील पूरस्थिती दिवसेंदिवस अत्यंत बिकट होत चालली आहे. पूरस्थिती ओसरावी व नागरिकांना मदत मिळावी यासाठी देशभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे. रा. स्व. संघाचा एक भाग असलेल्या व नैसर्गिक आपत्तीत मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या सेवाभारतीकडून देखील येथील पुरग्रस्तांना मदतीचे मोठ्या प्रमाणात कार्य सुरू आहे. सेवा भारतीकडून आतापर्यंत ३,५०,००० पेक्षा जास्त गरजवंतांना अन्नाच्या पाकीटांचे वाटप करण्यात आले असून १० पेक्षा जास्त रक्तदान शिबिर केंद्रांचे आयोजनही करण्यात आले आहे.
सेवा भारती ही एक सामाजिक बांधिलकी जपणारी सेवाभावी संस्था आहे. सध्या ती केरळमधील पूरग्रस्तांना मदत करत आहे. केरळमध्ये आतापर्यंत पुराच्या तडाख्याने २ लाख नागरिक बेघर झाले असून सेवा भारतीची केरळमध्ये जवळपास ३५० केंद्रे कार्यरत आहेत. तर ५ हजार स्वयंसेवक येथे मदतकार्य करत आहेत.
केरळमध्ये सेवा भारतीची सध्या २० आरोग्य केंद्रे कार्यरत आहेत. ही आरोग्य केंद्र कुट्टालनाडू, अलापुझ्झा या भागातील पूरग्रस्तांना मदत करत आहेत. तसेच केरळमध्ये ठिकठिकाणी सरकारकडून ४५० मदत केंद्रे उभारण्यात आली असून ती पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत पुरवत आहेत.
केरळमधील पूरग्रस्त भागात सेवा भारतीच्या ४० रुग्णवाहिका नागरिकांच्या सेवेला आहेत. शंभरहून अधिक सामान्य नागरिकही सेवा भारतीच्या या मदतकार्यात सहभागी झाले आहेत. तसेच सेवा भारती या संस्थेकडून केरळमधील पूरग्रस्तांना कपडे, अन्नधान्य, पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या व इतर जीवनावश्यक वस्तूंचा मदतपुरवठा केला जात आहे.
प्रत्येक जिल्ह्यातील सेवा भारतीच्या संकलन केंद्रातून सामान्य नागरिकांकडून केरळसाठी कपडे व जीवनावश्यक वस्तू गोळा केल्या जात आहेत. या वस्तू केरळमध्ये पोहोचवण्यासाठी वाहतूकीची व्यवस्थाही केलेली आहे. तसेच केरळसाठी सेवा भारती संस्था मदतनिधीही गोळा करत आहे.