ठाणे : उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील ध्वनिप्रदूषणावर आवर घालण्यासाठी तसेच पादचारी मार्गावर बेकायदेशीररित्या तात्पुरत्या स्वरूपात मंडप किंवा तत्सम रचना उभारणाऱ्या वर कार्यवाही करण्याकरिता महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागामार्फत ‘तक्रार निवारण यंत्रणा’ कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना उत्सवाच्या वेळी आपल्या तक्रारी सदर यंत्रणेकडे दाखल करणे सोपे होणार आहे. आगामी काळातील उत्सवांच्यावेळी ध्वनिप्रदूषण किंवा रस्त्यावर मंडप उभारण्याबाबतच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास नागरिकांना त्याबाबतच्या तक्रारी संबंधित यंत्रणेकडे दाखल करण्याकरिता ‘तक्रार निवारण यंत्रणा’ स्थापन करून प्रभावीपणे कार्यान्वित ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाने निर्देशित केले आहे.
या यंत्रणेद्वारे ठाणे महानगरपालिकेस प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर केलेल्या कार्यवाहीची माहिती नागरिकांना मिळावी याकरिता कार्यवाहीचा तपशील महापालिकेच्या संकेतस्थळावरही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तरी नागरिकांनी संबंधित तक्रारी नोंदविण्यासाठी तक्रार निवारण यंत्रणेचा वापर करावा, असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात आले आहे.