ग्रीक : 'विदेशात राहत असलेल्या भारतीय नागरिकांच्या मनामध्ये आपल्या देशाविषयी नितांत आदरभाव आहे. त्यामुळे त्यांनी आता आपल्या देशाच्या विकासामध्ये प्रमुख भूमिका बजावण्यासाठी पुढाकार घ्यावा', असे आवाहन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले आहे. ग्रीक दौऱ्यावर असलेले राष्ट्रपती कोविंद यांनी ग्रीकमधील भारतीय नागरिकांशी आज संवाद साधला, यावेळी ते बोलत होते.
'येत्या २०२५ पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेला ५ ट्रिलियन डॉलरपर्यंत घेऊन जाण्यासाठी भारत सरकार सध्या प्रयत्न करत आहे. भारतला फक्त स्वतःचाच नव्हे, तर संपूर्ण जगाचा देखील विकास करायचा आहे. त्यामुळे भारत सरकार त्यादृष्टीने प्रयत्न करत आहे. भारत सरकारने घेतलेल्या अनेक नव्या धाडसी निर्णयांमुळे भारतात व्यापार, संशोधन आणि गुंतवणुकीसाठी आज अनेक नव्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. त्यामुळे परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी देखील देशाच्या विकासासाठी आता पुढाकार घेतला पाहिजे', असे आवाहन कोविंद यांनी यावेळी केले.
याचबरोबर भारत आणि ग्रीक यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंधांवर देखील त्यांनी यावेळी चर्चा केली. भारत आणि ग्रीक यांच्यातील संबंध हे अनेक वर्ष जुने असून आज देखील दोन्ही देशांची तत्व आणि मूल्य एकसारखी आहे. त्यामुळे भविष्यात देखील या दोन्ही देशांचे संबंध अशाच प्रकारे वृद्धींगत होतील, असा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.