वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अधिकाऱ्यांना आवाहन
मुंबई : राज्यात यावर्षी १ जुलै ते ३१ जुलै या कालावधीत करण्यात येणाऱ्या १३ कोटी वृक्ष लागवडीची मोहीम यशस्वीरित्या राबविण्यासाठी अधिकाऱ्यांनी उत्तम नियोजन करण्याचे आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. तसेच पुन्हा एकदा विक्रम नोंदवत हरित महाराष्ट्राची संकल्पना साकारण्याठी प्रयत्नांची शर्थ करावी असेही ते म्हणाले. ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे शुक्रवारी १२ व्या वरिष्ठ वनाधिकाऱ्यांच्या परिषदेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे सचिव विकास खारगे, प्रधान मुख्य वनसंरक्षक अग्रवाल, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव ए.के. मिश्रा यांच्यासह वरिष्ठ वनअधिकारी उपस्थित होते.
राज्यात २०१६ साली वृक्षलागवडीच्या मोहीमेची सुरूवात करण्यात आली होती. ही महामोहीम गेल्यावर्षीही यशस्वी ठरली असल्याचे मुनगंटीवार म्हणाले. यामध्ये लोकसभागाचा महत्त्वाचा वाटा असून अधिकारी आणि कर्मचारी वर्गाचाही सिंहाचा वाटा असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, यावेळी १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या तयारीचा आढावा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी घेतला. त्याचप्रमाणे वन विभागाशी संबंधित इतर महत्वपूर्ण विषयांबाबत त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावर्षी १३ कोटी वृक्ष लागवड हे वन विभागाचे मुख्य उद्दिष्ट असून या लक्ष्यपूर्तीसाठी प्रत्येकाने स्वत: ला झोकून द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.