रडीचा डावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |



 

 
 
पहायला गेलं तर ‘बॉल टॅम्परिंग’ला तसा फार जुना इतिहास आहे. पण ‘बॉल टॅम्परिंग’ का केलं जात हे समजणे गरजेचे आहे. विदेशी खेळपट्ट्यांवर चेंडू अधिक वेगाने उसळी घेतो. चेंडू जूना होत नाही तोपर्यंत धावांचा डोंगर उभा राहातो. परिणामी विरोधी संघाला धक्का देण्यासाठी अशा कुटनितीचा वापर वेळोवेळी अशा खेळपट्ट्यांवर खेळताना विविध संघांनी केला आहे. काही दिवसांपूर्वीच असाच काहीसा प्रकार घडला आणि ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर, क्रिकेटपटू कॅमेरॉन बँक्रॉफ्ट प्रकाशझोतात आले.यानंतर सर्वच स्तरातून स्वाभाविकरित्या ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट संघावर टीकेची एकच झोड उठली. स्मिथची लबाडी बाहेर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षीही भारतदौर्‍यावर असताना मैदानातील पंचांनी दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्यासाठी त्याने मैदानातील आपल्या सहकारी खेळाडूऐवजी पॅव्हेलिअनमध्ये बसलेल्यांची मदत घेण्याचाअयशस्वी प्रयत्न केला. मात्र, भारताचा कर्णधार विराट कोहली याने ही बाब टिपत त्यावर आक्षेप घेतला आणि स्मिथची लबाडी हाणून पाडली. यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या दौर्‍यावरअसताना स्मिथने आपल्या सहकारी खेळाडूला चेंडूत फेरफार करण्यासाठी टेपचा तुकडा घेऊन मैदानात धाडले. मात्र, यातून स्मिथच्या बालबुद्धीचे दर्शन घडून आले. जवळपास १३ कॅमेर्‍याची चेंडूवर नजर असताना त्याने हा कारनामा करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच कॅमेर्‍यानी ही बाब अगदी अचूकरित्या टिपली. मैदानात स्लेजिंग किंवा शिवीगाळासारखे प्रकारही ऑस्ट्रेलियन संघाची देणगी आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. डेनिस लिली आणि जेफ थॉमसनसारख्या दिग्गज खेळांडूंनी रडीची परंपरा सुरू केली, तर त्यात स्मिथसारख्या खेळाडूकडून अपेक्षा करणेही चुकीचे ठरेल. प्रतिस्पर्धी संघाला जिंकण्याची संधी असताना गोलंदाजांना अडथळा निर्माण व्हावा, यासाठी त्याच्या धावण्याचा जागेत केकचे तुकडे टाकण्यापर्यंतचे कृत्य या दिग्गजांनी केले. दरम्यान, त्या ठिकाणी पक्षी येऊन ते खाऊ लागल्याने गोलंदाजांना अडथळा निर्माण झाला, तर दुसरीकडे पाकच्या जावेद मियाँदाद यांना लाथ मारण्यायापर्यंत प्रकार त्यांच्याकडून करण्यात आले. असो... पण वाट्टेल त्या मार्गाने विजय मिळवणे किंवा सामना जिंकण्यासाठी टेपचा आधार घ्यावा लागणे हे नक्कीच अशोभनीय. स्मिथवर वर्षभराची बंदी घातली गेली, प्रशिक्षकानेही नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामा दिला हे खरे असले तरी खेळाडूंची ही लबाडी कधी थांबेल हा मोठा प्रश्न आहे

अस्तित्वाची लढाई...

येता काळ हा निवडणुकांचा काळ म्हटला तरी गैर ठरणार नाही. त्रिपुरा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर विरोधकांचे धाबे दणाणले. कम्युनिस्टांची लाल गढी भाजपने उद्ध्वस्त करुन टाकली. गुजरात, त्रिपुरामधील निवडणुकांमध्ये अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर देशभरात भाजपची ताकद नक्कीच वाढली. त्यातच आता आणखी एक प्रतिष्ठेची निवडणूक म्हणजे १२ मे रोजी होणारी कर्नाटक विधानसभेची निवडणूक. त्यामुळे येत्या दीड महिन्यांत राष्ट्रीय राजकारणातही कर्नाटकच्या राजकीय किश्शांची सर्वाधिक चर्चा होणार, हे नक्की! लोकसभा निवडणुकांपूर्वी राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशच्या विधानसभा निवडणुकांचे वारे वाहणार आहेत. त्यामुळे आगामी काळात देशातले राजकीय वातावरण ढवळून निघेल, यात शंका नाही. काँग्रेस सत्तेत असलेल्या काही उरल्यासुरलेल्या राज्यांपैकीच कर्नाटक हे एक राज्य. त्यामुळे काँग्रेसची अस्तित्व टिकवण्याची धडपड येत्या दीड महिन्यात आणखीनच तीव्र होईल, तर दुसरीकडे संपूर्ण देश भाजपमय करायला निघालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यासाठीदेखील ही निवडणूक तितकीच महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे लोकसभेची एक दिशा म्हणूनदेखील या निवडणुकांकडे पाहिले जाते. भाजप, काँग्रेस आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या जेडीएस या पक्षाच्या ताकदीमुळे यंदाची निवडणूक नक्कीच तिरंगी ठरणार आहे, तर दुसरीकडे सिद्धरामय्या यांनीदेखील गेल्या वर्षभरापासूनच या निवडणुकीची तयारी केली आहे. वर्षभरात आपली मतपेढी भक्कम करण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित अनेक निर्णय त्यांनी अतिशय चाणाक्षपणे घेतले. मग तो कर्नाटकातील मोठ्या संख्येत असलेल्या लिंगायत समाजाला खुश करण्यासाठी लिंगायतला स्वतंत्र धर्माचा दर्जा बहाल करण्याचा निर्णय असो, अथवा कन्नड अस्मितेसाठीच्या प्रदर्शनासाठी राज्यध्वजाची फडकवाफडकवी, सिद्धरामय्यांनी कोणतीही कसर सोडलेली नाही. दुसरीकडे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजपनेही सिद्धरामय्यांचे मनसुबे धुळीस मिळण्यासाठी कंबर कसली आहेच. लिंगायत समाजातला एक मोठा गट आजही भाजप समर्थक आहे आणि भाजप नेते बी. एस. येडियुरप्पा यांचा प्रभाव या समाजावर अजूनही कायम आहे. तसेच दुसरा समाज जो कर्नाटकातील निवडणुकीत निर्णायक ठरू शकतो तो म्हणजे,वोक्कालिंग समाज. हा समाज आज जेडीएससारख्या पक्षाच्या मागे आहे. त्यामुळे काँग्रेससह भाजपलाही कर्नाटकाची निवडणूक तितकीच आव्हानात्मक असेल, हे नक्की.

@@AUTHORINFO_V1@@