नवी दिल्ली : गेल्या पाच दिवसांपासून कॉंग्रेस आणि विरोधी पक्षांकडून संसदेचे कामामध्ये अडथळा निर्माण केला जात आहे, त्यामुळे गांधी घराण्याचा खरचं लोकशाही विश्वास आहे का ? असा प्रश्न केंद्रीय मंत्री अनंत कुमार यांनी कॉंग्रेसला विचारला आहे. नवी दिल्लीमध्ये पत्रकरांची संवाद साधताना ते बोलत होते.
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याला गेल्या पाच-सहा दिवसांपासून सुरुवात झाली. परंतु एकदाही कॉग्रेस आणि विरोधकांनी सभागृहाचे कामकाज व्यवस्थितपणे चालू दिलेले नाही. सरकारने चर्चेसाठी तयारी दाखवली असताना देखील काँग्रेस ऐकून घ्यायला तयार नाही, त्यामुळे सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे फक्त जनतेला भुलवण्यासाठी जनतेसमोरच लोकशाहीच्या गप्पा मारतात, प्रत्यक्षात मात्र कधीच लोकशाही प्रमाणे वागत नाहीत', अशी जोरदार टीका त्यांनी वेळी केली.
तसेच संसदेचे अधिवेशन हे देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असून देशहितासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय हे अधिवेशनादरम्यान घेतले जातात. ते सर्व पक्षांना माहित आहे. त्यामुळे कृपया या सर्वांनी अधिवेशन व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.