वयाच्या २२ व्या वर्षापर्यंत बाबर अनेक युद्ध लढला होता. बाबरने आपल्या कारकिर्दीत एकूण पाचवेळा भारतावर आक्रमण केले. त्याच्या प्रत्येक विजयाचं प्रमुख कारण होतं त्याचं कुशल नेतृत्व आणि त्याचा तोफखाना. भारतात तोफेचा वापर प्रथम बाबरनेच केला. पानिपतच्या युद्धात विजयी झाल्यानंतर बाबरने काबूलच्या प्रत्येक रहिवाशाला चांदीचा शिक्का दान केला होता. त्याच्या या उदार वृत्तीमुळे त्याला ‘कलंदर’ ही उपाधी मिळाली होती. ‘बाबरनामा’ ही बाबरची आत्मकथा ‘तुजुके बाबरी’ या नावानेही प्रसिद्ध आहे. बाबरचा सेनापती मीर बाकीने अयोध्येत १५२८ ते १५२९ च्या मध्यकाळात एक मोठी मशीद बांधली जी ‘बाबरी’ मशीद म्हणून ओळखली गेली. १५३० मध्ये त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मोठा मुलगा हूमायूँ मुघल साम्राज्याचा शासक बनला. त्याने आपल्या भावांमध्ये आपल्या राज्यांची वाटणी केली. इतिहासतज्ज्ञांच्या मते हीच त्याची मोठी चूक होती. त्याचा सावत्र भाऊ कामरान मिर्जा लाहोर व काबूल हे प्रदेश सांभाळू लागला. हाच पुढे हूमायूँचा मोठा शत्रू ठरला. हूमायूँचे शासन अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि उत्तर भारतात होते. हूमायूँची कारकीर्द फारशी प्रभावी नव्हती. अफगाणांना मुघलांनी भारत सोडून जावे, असे वाटत असे. त्याचमुळे १५४० मध्ये कन्नोजच्या युद्धात शेरशाह सूरी याने हूमायूँला पराभूत केल्यानंतर हूमायूँ भारत सोडून गेला. इ.स. १५५५ मध्ये त्याला सत्ता पुन्हा मिळाली. परंतु, दुर्दैवाने १५५६ मध्ये दिल्लीचा किल्ला ‘दीनपनाह’ येथे त्याचा मृत्यू झाला. इ.स.१५४० ते १५५५ मध्ये अफगाणच्या शेरशहा सुरी याने भारतावर सत्ता केली. त्याला ‘शेरखान’ असेही म्हटले जाते. त्याने जुनी नाणी बदलून त्याजागी शुद्ध सोन्या-चांदीची नाणी आणली. भारतात रुपया हे चलन त्यानेच प्रथम प्रचलनात आणले. एका रुपयात १७८ ग्रॅम चांदी असे. त्याच्या काळात महसूल म्हणून गोळा केला जाणारा कर हा भूमीवर आधारित असे. मलिक मोहम्मद जायसीने ‘पद्मावत’ची रचना शेरशाह सुरीच्या कालखंडातच केली होती. सोनार गावापासून पेशावरपर्यंत जाणारा ‘सडक-ए-आजम’(द ग्रँड ट्रंक रोड) च्या निर्मितीकरिता शेरशाह सुरी ओळखला जातो.
जलालुद्दिन मोहम्मद अकबर हा तैमूर वंशावळीतला मुघल वंशाचा तिसरा शासक होता. त्याच्या शासनकाळात मुघल साम्राज्य भरभराटीला आले तसेच विशाल मुघल साम्राज्याचा उदय झाला. १४ फेब्रुवारी १५३६ मध्ये त्याचा राज्याभिषेक झाला. पानिपतच्या दुसर्या युद्धात उत्तर भारताचे हिंदू शासक सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य (हेमू) आणि अकबराच्या सेनेदरम्यान घनघोर युद्ध झाले आणि त्यात अकबर विजयी झाला. अकबर आणि महाराणा प्रताप यांच्यात १८ जून १५७६ रोजी हल्दीघाट येथे घनघोर लढाई झाली. हे युद्ध महाभारताच्या युद्धासारखंच विनाशकारी ठरलं. यातही मुघलांनाच यश मिळालं. अकबरानेच १५०२ मध्ये ‘दीन-ए-इलाही’ नावाचा नवीन धर्म निर्माण केला. अकबराचा दरबार ‘नवरत्नांचा दरबार’ म्हणून प्रसिद्ध होता ज्यात तानसेन, राजा बिरबल, तोडरमल, मुल्ला दो प्याजा, अब्दुल रहीमखान, अबुल फजल, मानसिंह, फैजी आणि हकीम हुमाम यांचा समावेश होता. तरीही या सर्वात बिरबल श्रेष्ठ गणला जात असे. आजही त्याचे किस्से, गोष्टी विख्यात आहेत. अकबराला धर्मातील भेदभाव मान्य नव्हता. म्हणूनच त्याने ‘दिन-ए-इलाही’ची निर्मिती केली. त्यामुळे साहजिकच प्रजेचा त्याच्यावर लोभ होता. त्याने सुयोग्य प्रशासनाकरिता ‘मनसबदार’पद्धत आरंभली. त्याने आपल्या प्रदेशांची १५ सबांमध्ये विभागणी केली. त्या सबेची व्यवस्था बघणार्या अधिकार्याला श्रेणी दिली जात असे, जिला ‘मनसब’ असे म्हटले जात असे. त्या अधिकार्यांना वेतन म्हणून काही जमीन दिली जात असे, जिला ‘जागीर’ असे म्हटले जाई. राजकोषाचे प्रमुख स्त्रोत महसूल व व्यापार असे. युरोपियनांना सागरी मार्ग खुला करण्याचे मुख्य कारण व्यापारवृद्धी हेच होते. त्याचे हिंदूंबरोबर मैत्रीपूर्ण संबंध होते. त्याने आपली राजधानी आग्य्रावरून फतेहपूर सिक्री येथे हलवली. त्याने सूर्यावर आधारित ‘इलाही संवत’ नावाची नवीन कालगणना सुरू केली होती. गुजरातवरील विजयाच्या स्मरणार्थ त्याने आपली राजधानी फतेहपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा बनवला.
अबुल फजल या त्याच्या नवरत्नांपैकी एकाने, जो राजकवी होता, अकबरावर ‘अकबरनामा’ आणि ’आईने अकबरी’ नावाची पुस्तके लिहिली. अकबराने आपल्या साम्राज्यात एकच सरकारी ‘फारसी’ भाषा प्रचलित केली. तो स्वतः अशिक्षित असूनही त्याने नेहमी विद्वानांना राजाश्रय दिला तसेच वेळोवेळी त्यांचा योग्य तो सन्मानही केला. म्हणूनच त्याच्या दरबारात एकापेक्षा एक अशी नऊ रत्ने होती. १६०५ मध्ये अकबराच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा सलीम ज्याला ‘जहाँगीर’ असेही म्हटले जाते, त्याने राज्यकारभाराचा ताबा घेतला.
जहाँगीर आपल्या वडिलांप्रमाणेच उदार मनोवृत्तीचा होता. त्याने नाक, कान, हात छाटण्याच्या हिंसक शिक्षा रद्द केल्या. जहाँगीरला पाच मुलगे होते. त्याच्या शासनकाळात इंग्लंडचा सम्राट जेम्स प्रथम याने कॅ. हॉकिन्स तसेच थॉमस याला भारतात पाठवले, ज्यामुळे इंग्रजांना भारतात व्यापारी सुविधा मिळाल्या. जहाँगीरने जेव्हा ब्रिटिशांना भारतात कारखाने काढण्याची परवानगी दिली तेव्हा त्याला ही साधी कल्पनाही नव्हती की, हेच ब्रिटिश पुढे जाऊन सार्या भारतावर कब्जा करतील. त्याच्या काळात चित्रकलेला चांगले दिवस आले, कारण खुद्द जहाँगीरला चित्रकलेची आवड होती. त्याने आग्य्राजवळ सिंकदराबादमध्ये ‘अकबर का मकबरा’ निर्माण केले. त्यानेच लाहोरमध्ये मशिदी बांधल्या तसेच काश्मीरमधील अवर्णनीय असे शालिमार उद्यान निर्मिले. यावरून त्याची कलात्मक दृष्टी जाणता येते.
त्यानंतर शहाजहाँ हा पाचवा मुघल शासक बनला. शहाजहाँचा विवाह अर्जुमन्द बानू बेगम हिच्याशी झाला, जी पुढे ‘मुमताज’ या नावाने ओळखली जाऊ लागली. शहाजहाँ- मुमताजला चार मुलगे आणि तीन मुली होत्या. इ. स. १६३१ मध्ये मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहाँनने आग्य्राच्या यमुना नदीजवळ ‘ताजमहाल’चे बांधकाम सुरू केलं, जे १६५३ मध्ये पूर्ण झालं. मुमताजला तिथेच दफन करण्यात आले. हाच ताजमहाल आज जगातील सात आश्चर्यांपैकी एक ठरला आहे. मुघलकालीन स्थापत्यकलेचा ताजमहाल एक अप्रतिम नमुना ठरला आहे. शहाजहाँनने १६३२ मध्ये पोर्तुगालांबरोबर युद्ध करून हुबळीवर आपले वर्चस्व स्थापित केले. त्यानेच जगप्रसिद्ध ‘मयुर सिंहासन’ बनवले. शहाजहाँनचा मुलगा औरंगजेब हा प्रचंड सत्ताकांक्षी होता. सत्तेसाठी त्याने आपल्या पित्यालाच कैद केले. भावांबरोबर युद्ध केले. १६५९ मध्ये त्याने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला. त्याने स्वतःच आपल्या नावामागे ‘आलमगीर’ ही उपाधी लावली होती, ज्याचा अर्थ होतो विश्वविजेता. अकबरानंतर हाच एक मुघल बादशहा होता, ज्याने बरीच वर्षे सत्ता टिकवून ठेवली. त्याने जवळपास ५० वर्ष सत्ता उपभोगली. त्याचे स्वतःचे राहणीमान अतिशय साधे होते. तो टोप्या विणून आणि कुराणातील आयत लिहून स्वतःचा चरितार्थ चालवत असे. औरंगजेबाचा कार्यकाल प्रचंड धामधुमीचा, संघर्षाचा होता. त्याच्याच काळात मुघल सत्तेचा सर्वाधिक विस्तार झाला. तो कट्टर मुस्लीम होता. त्यामुळेच शीख संप्रदायाचे गुरू तेगबहादुर सिंग यांनी इस्लामधर्म स्वीकारला नाही, म्हणून कपटी औरंगजेबाने त्यांची हत्या केली. त्याने मुस्लिमेतर जनतेवर अन्याय अत्याचार केल्याने प्रजेमध्ये असंतोष माजला. याचमुळे राजपूत, शीख, जाट, मराठा यांच्याबरोबर त्याचे वारंवार संघर्ष होत असे. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी शेवटपर्यंत त्याला जेरीस आणले होते. त्यात भर म्हणून इंग्रज आणि पोर्तुगाल यांच्याशी त्याचा संघर्ष होत असे.