कोणाचं आयुष्य कोणत्या क्षणी बदलेल आणि त्या व्यक्तीच्या आयुष्यात किती बदल होतील हे कोणीच सांगू शकत नाही. काळ बदलत जातो. त्यानुसार प्रत्येकजण येणार्या परिस्थितीला तोंड देतो. त्या परिस्थितीवर मात करतो आणि पुढे जातो. शालेय जीवनात ती व्यक्ती किती यशस्वी होती किंवा अयशस्वी होती, याचा पाढा पुढे यशस्वी झाल्यावर कोणीच वाचत नाही. वैयक्तिक पातळीवर व्यक्तीने कशाप्रकारे आलेल्या परिस्थितीवर मात केली याचीच चर्चा होते. अशा कहाण्या आपल्याला नेहमीच एखाद्या चित्रपटातील कथानकाप्रमाणे भासतात. त्यामुळेच एखाद्या व्यक्तीचा प्रेरणादायी प्रवास वाचून आपण भारावून जातो आणि त्या व्यक्तीने घेतलेल्या कष्टाचे कौतुक करत आपणही तसे प्रयत्न आणि कष्ट करण्याची तयारी दर्शवतो. सध्या तरुणांमध्ये अशाप्रकारे कष्ट करण्याची तयारी आहे, पण त्यांना चाकरी करण्यात अजिबात रस नाही. त्यामुळे ‘स्टार्टअप’ या संकल्पनेचा उगम आपल्या देशातही आता रूजू लागला आहे. तरुणांचा सहभाग आणि त्यांच्या नव्या संकल्पनांनी युक्त असे अनेक ‘स्टार्टअप’ सध्या देशभर सुरू आहेत. ही कहाणीदेखील अशीच आहे.
मेहुल अग्रवाल याची... स्पर्धा परीक्षा आणि विविध प्रकारच्या अभ्यासक्रमांसाठी ओळखल्या जाणार्या जमशेदपूर येथील मेहुल अग्रवाल तसा दिसायला एक सर्वसामान्य मध्यमवयीन तरुण. शालेय अभ्यासक्रमांमध्ये फारशी उल्लेखनीय कामगिरी करू न शकलेल्या मेहुलला या एका गोष्टीमुळे अनेकदा बोलणीही खावी लागली. पण, परिस्थिती आणि वेळ कधी ना कधी बदलते हेच खरे. कारण, खुद्द मेहुललाच याचा प्रत्यय आला. निकालातील आकडेवारीच सर्वकाही ठरवत नाही, हीच धारणा मेहुलच्या प्रेरणादायी आणि यशस्वी प्रवासामुळे मोडीत काढली गेली. स्टार्टअप सुरू करू इच्छिणार्यांसाठी प्रेरणास्थानी असणार्या आणि त्यांना मार्गदर्शन करू पाहणार्या मेहुलने झारखंडमधील व्यावसायिकांना मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याशिवाय त्याने राज्य सरकारला आदिवासी भागात राहणार्या आणि व्यवसाय क्षेत्रात प्रगती करू इच्छिणार्यांना आपण मार्गदर्शन करण्यास उत्सुक असल्याचेही त्याने एका पत्राद्वारे कळवले.