मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गुन्हे अन्वेषण संस्थेनी (सीबीआय) आज पीएनबीच्या तीन अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. तसेच मुंबई सीबीआय न्यायालयाने या तिघांनाही पुढील सुनावणीपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे.
गोकुळनाथ शेट्टी, मनोज खराज आणि हेमंत भट असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांचे नाव असून यातील शेट्टी हा मुंबई पीएनबीच्या संबंधित शाखेचा निवृत्त शाखा उपव्यवस्थापक आहे. आज सकाळी सीबीआयने या तिन्ही अधिकाऱ्यांना मुंबईमधून अटक केली व त्यानंतर लगेच त्यांना सीबीआय विशेष न्यायालयासमोर हजर करण्यात आले. यानंतर विशेष न्यायालयाने या प्रकरणीची पुढील सुनावणी ३ मार्चला करण्यात येणार असल्याचे जाहीर करून तोपर्यंत या तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान नीरव मोदी अद्याप फरार असून देशभरातील त्याच्या संपत्तीवर धाड घालण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. मोदीच्या मालकीच्या अनेक कंपन्यांवर पोलिसांनी धाड टाकून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत. केंद्र सरकारने देखील या प्रकरणात लक्ष घालत नीरव मोदीवर आणि इतर संबंधित दोषींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.