नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगढच्या विधानसभा निवडणुकांत मोठे यश मिळवून दोन दिवसही उलटत नाहीत, तोच काँग्रेस पक्षाला गटबाजीचे ग्रहण लागल्याचे दिसत आहे. विशेषतः राजस्थान व मध्य प्रदेश या दोन राज्यांच्या मुख्यमंत्रीपदांवरून पक्षातील अंतर्गत संघर्ष वाढला असल्याचे दिसत आहे. राजस्थानात अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात व मध्य प्रदेशात कमलनाथ व ज्योतिरादित्य शिंदे यांच्यात मुख्यमंत्री बनण्यासाठी जोरदार चुरस निर्माण झाली असून यामुळे ज्येष्ठांचे अनुभवी मुरब्बीपण की युवा नेतृत्वाची आक्रमकता यापैकी नेमकी कोणाची निवड करायची, असा पेचप्रसंग काँग्रेस अध्यक्ष खा. राहुल गांधी यांच्यासमोर निर्माण झाला आहे.
निवडणुकांच्या निकालानंतर काँग्रेस पक्षाने अर्थातच ठराव संमत करून मुख्यमंत्री निवडीचे अधिकार राहुल गांधी यांना दिले. राहुल यांच्या युवा टीममधील खंदे सहकारी असणारे सचिन पायलट व ज्योतिरादित्य शिंदे यांची मुख्यमंत्रीपदांसाठी निवड होण्याची अटकळ सुरूवातीला व्यक्त करण्यात येत होती. मात्र, मध्य प्रदेशात ज्येष्ठ नेते कमलनाथ यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा सुरू झाली. तसेच, पक्षाच्या विधीमंडळ बैठकीत कमलनाथ यांच्या नावाची शिफारस करण्याचा प्रस्ताव आल्याचेही सूत्रांनी सांगितले. मात्र, त्यांच्या नावाची अधिकृतरित्या घोषणा झाली नाही. दुसरीकडे ‘आपल्याला मुख्यमंत्री व्हायला आवडेल’ असे सांगत आपण प्रबळ दावेदार असल्याचे ज्योतिरादित्य यांनी स्पष्ट केले होते. परंतु, काँग्रेसचे ‘कमल’ फुलु लागताच शिंदे समर्थकांमध्ये मोठी नाराजी पसरली. तसेच, यावरून दोन्ही गटांच्या समर्थकांमध्ये वादावादी झाल्याचेही काँग्रेसमधील सूत्रांनी सांगितले.
पायलटांच्या भरारीला लगाम, कार्यकर्ते बिथरले
मध्य प्रदेशात कमलनाथ यांचे नाव पुढे येऊ लागल्यानंतर राजस्थानातही अशोक गेहलोत यांच्याच नावावर राहुल गांधी यांनी शिक्कामोर्तब केल्याचे म्हटले जाऊ लागले. यानंतर सचिन पायलट समर्थकांमध्ये प्रचंड नाराजी पसरली. पायलट जर मुख्यमंत्री झाले नाहीत तर आम्ही काँग्रेस पक्ष सोडू, असा इशाराही पक्षाच्या काही नवनिर्वाचित आमदारांनी दिला. पायलट समर्थकांनी अनेक ठिकाणी रस्त्यावर उतरून पायलट यांच्या बाजूने घोषणाबाजी केली. तसेच, स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार, अनेक ठिकाणी या कार्यकर्त्यांनी उग्र आंदोलने केली. कैरोली भागात रस्ता रोखून धरण्यात आला तर एका बसचीही तोडफोड करण्यात आल्याचे समजते. यानंतर सचिन पायलट यांनी तातडीने ट्विटरवरून आपल्या समर्थकांना शांत केले. तसेच, पक्ष नेतृत्वाचा निर्णय आपल्याला मान्य असेल, असेही स्पष्ट केले.
राहुल यांच्यापुढे पेचप्रसंग
या साऱ्या घटनांमुळे विजयाच्या आनंदाला दोन दिवस होत नाहीत तोच पक्षातील गटबाजीला उधाण आल्यामुळे राहुल गांधी यांची मोठी अडचण झाली आहे. संसदेच्या परिसरात पत्रकारांनी राहुल यांना याबाबत विचारले असता, लवकरच मुख्यमंत्रीपदांबाबत घोषणा करण्यात येईल असे स्पष्ट केले. तसेच, याबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असल्याचेही ते म्हणाले. मात्र, नवी दिल्लीतील माध्यमांकडून माहितीनुसार, या गटबाजीच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, त्यांच्या कन्या प्रियांका गांधी यांच्यासह गांधी कुटुंबियांचे जवळचे काँग्रेस नेते राहुल यांच्या निवासस्थानी एकत्र आले होते. या बैठकीत नेमकी काय चर्चा झाली हे समजू शकले नाही, मात्र यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी अंतिम निवड झाली असल्याचे सूत्रांकडून समजते.
“सर्व कार्यकर्त्यांनी संयम व शिस्त बाळगावी, असे मी आवाहन करतो. माझा पक्षनेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. कार्यकर्त्यांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये. राहुल व सोनिया गांधी जो काही निर्णय करतील, तो आम्हाला मान्य असेल.”
- सचिन पायलट, काँग्रेस नेते