मिझोरामने नाकारला काँग्रेसचा हात

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Dec-2018
Total Views |
 
 

गेली दहा वर्षे मिझोरामवर राज्य करूनही मिझोरामने काँग्रेसचा हात नाकारला आहे. त्यामुळे मिझोराममध्ये काँग्रेसला सत्तेतून पायउतार व्हावे लागले आहे. याशिवाय मिझोरामचे मुख्यमंत्री ललथनहवला यांचा सरछिप आणि चंफाई जिल्हा या दोन्ही जिल्ह्यांत दारुण पराभव झाला आहे. त्यामुळे मिझो नॅशनल फ्रंटने काँग्रेसला भुईसपाट करत, एकहाती सत्ता हस्तागत केली आहे. एकूण ४० जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत बहुमताचा आकडा २१ होता, तर मिझो नॅशनल फ्रंटने २६ जागा जिंकत बहुमताचा आकडा सहज पार केला. या निवडणुकीत काँग्रेस, मिझो नॅशनल फ्रंट, भाजप आणि मिझोराम पीपल्स कॉन्फरन्स यांच्यात मुख्य लढत अपेक्षित होती. मात्र, मिझो नॅशनल फ्रंटला एकहाती सत्ता मिळाली आहे. विशेष म्हणजे मिझोराममध्ये केवळ दोनच मुख्यमंत्री झाले आहेत. सध्या मिझो नॅशनल फ्रंटचे पु. जोरमथंगा हे मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत. दरम्यान, २०१३ सालच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ३४ जागांसह आपली सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी एमएनएफचे अवघे पाच आमदार निवडून आले होते. मात्र, जोरमथंगा यांच्या नेतृत्वाखाली एमएनएफने एक हाती सत्ता स्थापन केली आहे.

 

ईशान्येकडील सात राज्यांपैकी सहा राज्यांत भाजपची सत्ता असताना केवळ एका राज्यात काँग्रेसची सत्ता होती. त्यामुळे २००७ ते २०१८ अशी तब्बल १० वर्षे सत्ता गाजवल्यानंतर काँग्रेसचा झालेला हा पराभव ललथनहवला यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. ऐन निवडणुकीच्यावेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व गृहमंत्री आर. ललजिरलियाना व कॅबिनेट मंत्री ललरिनलियाना सायलो यांनी एमएनएफमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. बुद्धा धन चकमा व विधानसभा सभापती हिफेई भाजपच्या गटात आले होते. या प्रमुख चार नेत्यांच्या पक्ष बदलाचा फटका या निवडणुकीत बसला.

 

दिग्गजांचे काय झाले?

 

मतदारसंघ- सरछिप आणि चंफाई जिल्हा

पराभूत- ललथनहवला (काँग्रेस)

मतदारसंघ- दक्षिण मिझोरम

विजयी- डॉ. बुद्धा धन चकमा (भाजप)

मतदारसंघ- ऐझॉल

विजयी- पु. जोरमथंगा (एमएनएफ)

 

काँग्रेसच्या पराभवाची कारणे

 

) ऐन निवडणुकीच्या वेळी प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष व गृहमंत्री आर. ललजिरलियाना व कॅबिनेट मंत्री ललरिनलियाना सायलो यांचा एमएनएफमध्ये प्रवेश. काँग्रेसचे माजी मंत्री डॉ. बुद्धा धन चकमा व विधानसभा सभापती हिफेई यांचा भाजपमध्ये प्रवेश

 

) लाल थनहवला यांच्या सरकारने २०१४ मध्ये हटवलेली दारूबंदी

 

) बांग्लादेश, नेपाळ, म्यानमार या देशांतून होणारे बेकायदा स्थलांतर

 

) मिझो नॅशनल फ्रंट आणि भाजप यांच्यावर मिझोरामची संस्कृती, भाषा आणि इतिहास संपवून टाकण्याची काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांची टिका

 

त्यामुळे इतिहास निर्माण करण्याची भाषा करणार्‍या राहुल गांधीसह काँग्रेसचे ’माजी ’ मुख्यमंत्री ललथनहवला यांचा सुपडा साफ झाल्याने आता येत्या चार वर्षांत त्यांना आत्मचिंतनाची खरी गरज आहे.

 

पु. जोरमथंगा मुख्यमंत्रिपदाचे प्रमुख दावेदार

 

मिझोराममध्ये १९९८ ते २००८ पर्यंत नॅशनल फ्रंटचे सरकार होते. त्यावेळी पु. जोरमथंगा हे मुख्यंत्री होते. १९८७ मध्ये आमदार म्हणून निवडून आल्यानंतर जोरमथंगा पहिल्यांदा राज्याचे शिक्षण आणि अर्थमंत्री झाले होते. राज्यात बहुमतासाठी २१ जागांची आवश्यकता आहे. या निवडणुकीत एकूण २०९ उमेदवार उतरले होते. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे ३४, तर एमएनएफचे अवघे पाच आमदार निवडून आले होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
@@AUTHORINFO_V1@@