महिलांनी अडचणींना तोंड देत सरावासह खेळामध्ये ठसा उमटवावा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-Nov-2018
Total Views |

 शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो खेळाडू सुप्रिया गाढवे यांचे प्रतिपादन

जळगाव
 
क्रीडा क्षेत्रात असंख्य अडचणींना महिलांना सामोरे जावे लागते. मात्र या अडचणींना तोंड देत सातत्याने सराव करुन आपला ठसा खेळामध्ये उमटवावा असे आवाहन शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खो-खो खेळाडू सुप्रिया गाढवे यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात आयोजित पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो (महिला) स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी केले. स्पर्धेच्या आजच्या पहिल्या दिवशी एस.एन.डी.टी.महिला विद्यापीठ, मुंबई, सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट आणि देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर यांनी प्रतिस्पर्ध्यांवर मात करीत आपला पहिला विजय नोंदविला.
 
सोमवार, 19 नोव्हेंबरपासून विद्यापीठात पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ खो-खो महिला स्पर्धांना मोठया उत्साहात प्रारंभ झाला. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, गोवा, राजस्थान, मध्यप्रदेश या पाच राज्यांमधील 62 विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत.
 या स्पर्धेचे उद्घाटन सुप्रिया गाढवे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरु प्रा.पी.पी. माहुलीकर होते.
 
यावेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य व स्पर्धेचे कार्याध्यक्ष दिलीप पाटील, प्राचार्य एल. पी. देशमुख, प्रा. नितीन बारी, दिपक पाटील, डॉ. जितेंद्र नाईक, कुलसचिव भ. भा. पाटील, सिनेट सदस्य नितीन ठाकूर, विद्यार्थी विकास विभागाचे प्रभारी संचालक प्रा.ए.बी. चौधरी, प्रा. प्रतिभा ढाके, डॉ.के.एफ. पवार यांची उपस्थिती होती.
 
सुप्रिया गाढवे यांनी खेळाडूंना शुभेच्छा देताना आपण सकाळ व संध्याकाळी नित्यनियमाने सराव केला व त्यातून यश प्राप्त झाले असे सांगितले. दिलीप पाटील यांनी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ हे खेळाडूंच्या पाठीशी सातत्याने उभे असते असे सांगून स्पर्धांच्या काळात विद्यापीठाच्या परीक्षा आल्या तर खेळाडूंना परीक्षेची पर्यायी व्यवस्था उपलब्ध करुन देण्याचा तसेच खेळाडूंचा विमा उतरविण्याचा विद्यापीठाचा विचार असल्याचे यावेळी सांगितले.
 
अध्यक्षीय भाषणात प्रा. माहुलीकर यांनी ऑलिम्पिकमध्ये खो-खो या खेळाचा समावेश व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करुन या खेळात चपळता आणि बौध्दिक क्षमता महत्वाची असल्याचे नमूद केले.
 
यावेळी स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे मैदानावर पथसंचलन करण्यात आले. सायली चित्ते या विद्यार्थिनीने खेळाडूंना शपथ दिली. प्रास्ताविक क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील यांनी केले.
 
सुत्रसंचालन प्रा. जी. ए. उस्मानी यांनी केले. सहाय्यक क्रीडा संचालक आर. ए. पाटील यांनी आभार मानले. यावेळी राष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबॉल स्पर्धेत विद्यापीठाला अजिंक्यपद प्राप्त करुन दिलेल्या खेळाडूंचा तसेच प्रशिक्षक प्रा. जयंत जाधव यांचा सत्कार करण्यात आला.
 
उद्घाटनानंतर पहिल्या सत्रात एस. एन. डी. टी. महिला विद्यापीठ, मुंबई विरुध्द इंडियन इन्स्टिटयूट ऑफ टिचर्स एज्युकेशन गांधीनगर, गुजरात यांच्यात पहिला सामना झाला. यामध्ये मुंबईच्या महिला खेळाडूंनी गांधीनगरचा 24-11 असा पराभव केला.
 
13 गुणांनी विजय प्राप्त केलेल्या एस. एन. डी. टी.विद्यापीठाच्या श्वेता पाटील हिने दोन मिनिटे संरक्षण केले. तसेच 8 गडी देखील बाद केले. दुसरा सामना गुजरात विद्यापीठ, अहमदाबाद विरुध्द सौराष्ट्र विद्यापीठ, राजकोट यांच्यात झाला.
 
यामध्ये सौराष्ट्र विद्यापीठाने एक डाव आणि 13 गुणांनी गुजरातवर विजय प्राप्त केला. 18-5 अशा फरकाने विजय प्राप्त करताना सौराष्ट्रच्या काजलबेन चावडा हिने पहिल्या डावात 1 मिनिटे 20 सेकंद आणि दुसर्‍या डावात 2 मिनिटे 30 सेकंदाचे संरक्षण केले.
तसेच सहा गडी बाद केले.
 
तिसरा सामना देवी अहिल्याबाई विद्यापीठ, इंदोर विरुध्द श्री. गोविंद गुरु विद्यापीठ, गोध्रा यांच्यात झाला. यामध्ये इंदोरने 16-13 असा तीन गुणांनी विजय प्राप्त केला. मुस्कान जहारिया हिने 1 मिनिटे 20 सेकंदाचा संरक्षणात्मक खेळ केला. तसेच पाच गडी बाद केले.
@@AUTHORINFO_V1@@