सावरकरांची माफीपत्रे : आक्षेप आणि वास्तव - भाग-२

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Nov-2018   
Total Views |
 
 

सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी ब्रिटिशांकडे करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी त्यांची नव्हती. त्यासंबंधी सावरकरांच्या तसेच इतर लेखकांच्या ग्रंथातील संदर्भांचा घेतलेला हा आजच्या दुसऱ्या भागातील आढावा...

 

पहिले महायुद्ध १९१४ साली सुरू झाल्यावर सावरकरांनी हिंदुस्थान सरकारकडे आवेदनपत्र धाडले. ते पत्र मुळातूनच वाचावे. मी त्याचा मुख्य आशय उद्धृत करतो- हिंदुस्थानाला औपनिवेशक स्वायत्तता (Colonial-Self Government) द्यावी. वरिष्ठ विधिमंडळात हिंदी प्रतिनिधीचे निरपवाद बहुमत त्याबदल्यात क्रांतिकारक इंग्लंडला महायुद्धात साहाय्य देतील अशा मागण्या केल्या होत्या युरोपात बहुतेक राष्ट्रे आपआपली अंतर्गत राजबंदी सोडून देत होती, आयरिश राजद्रोही बंदीही सुटली होती, अशी उदाहरणेही दिली होती. तसेचसरकारने मला सोडता अंदमानातल्या, हिंदुस्थानातल्या आणि बाहेर देशोदेशी निर्वासित होऊन अडकून पडलेल्या राजबंदिवानांस तात्काळ मुक्त करावे. त्यांच्या मुक्ततेत मला जवळजवळ माझ्या मुक्ततेइतकाच आनंद वाटेल.” (माझी जन्मठेप, पृष्ठ २१९-२२०) अशी नि:स्वार्थी मागणीही केली होती. म्हणजे, सावरकरांची आवेदनपत्रे, मागण्या क्रांतिकारकांच्यावतीने सर्व क्रांतिकारकांच्यासाठी होत्या, केवळ स्वत:करिता नव्हत्या. ‘अंदमानच्या अंधेरीतूनया ग्रंथात आपला लहान भाऊ म्हणजे डॉ. नारायणराव सावरकरांना दि. सप्टेंबर, १९२०ला पाठवलेल्या पत्रात उल्लेख आहे की, एप्रिल, १९२०ला सावरकरांनी अर्ज केला. त्यात ब्रिटिशांकडे मागणी केली की, अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल, अशा रीतीने या क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे, अशी विनंती मी केली आहे. याच पत्रात सावरकर सांगतात, ”जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो, असे सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हाला या कोठडीत खितपत पडावे लागत आहे तरी; आपल्या सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणाऱ्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हाला वाटतात आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, अर्ज यांच्याद्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली, तिचे आम्हाला फळ मिळाल्याचे समाधान वाटते.” दि. ऑगस्ट, १९१८ च्या पत्रात सावरकर म्हणतात, ”अर्ज पाठविण्यात सर्व राजकीय बंद्यांची निरपवाद बंधमुक्तता हा माझा उद्देश आणि साध्य असल्यामुळे ते साधण्याच्या मार्गात माझे वैयक्तिक उदाहरण काट्यासारखे आड येत असेल, तर एकटे माझे नाव या बंधमुक्ततेतून वगळावयाला माझी अत्यंत संतोषाने संमती आहे.” बरं ही नि:स्वार्थी मागणी करताना सावरकरांची प्रकृती ढासळलेली होती. त्यांचे वजन मार्च १९१७ मध्ये ११९ पौंड होते. ते ऑगस्ट १९१८ मध्ये ९८ पौंड इतके कमी झाले होते. ‘’ऐवढेसे पत्र लिहिताना शरीराला त्रासाची जाणीव होते आहे.

 
 
दिवसानुदिवस हा जड देह झुरत चालला आहे,” असे हृदय हेलावून टाकणारे वाक्य सावरकर दि. ऑगस्ट, १९१८च्या पत्रात धाकट्या बंधूंना लिहितात. सुखासीन आयुष्यातील नि:स्वार्थी मागणीपेक्षा कष्टप्रद परिस्थितीतील नि:स्वार्थी मागणीमागील त्याग हा वंदनीय असतो अनुकरण करण्यास कठीण असतो. त्यामुळे त्यांनी स्वत:च्या व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या बदल्यात भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा त्याग केला हा आरोपच फोल ठरतो. कारण, एकतर अंदमानात कारावासात खितपत पडून भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग कसा घेता येईल? त्यासाठी शत्रूला फसवून कारागृहाबाहेर पडणे संधी मिळताच पुन्हा स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हेच योग्य होते. सावरकर आवेदनात स्वत:सह अंदमानातीलच नव्हे, तर भारतातील राजबंदिवानांना परदेशात अडकून पडलेल्या सर्वांना राजक्षमेचा लाभ मिळावा, अशी सामूहिक मागणी करत होते. ‘फक्त मलाच सोडा किंवा निदान मला तरी सोडा,’ अशी स्वार्थी मागणी करत नव्हतेसावरकरांना याची जाणीव होती की, काही झाले तरी ब्रिटिश आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत राजकारणात भाग घेऊ देणार नाहीत, म्हणून मगकारागारीय अन्वेक्षक मंडळापुढे त्यांनी अशी भूमिका मांडली की, “राजकारण करू देत नसाल, तर इतर दिशेने देशाची आणि मानवजातीची सेवा करीन. हित करण्यास झटेन. बरे, मी ते वचन मोडले, तर आपणास मला पुन्हा जन्मठेपीवर धाडता येईल.” तसेच राज्यपालांशी झालेल्या सुटकेसंदर्भातील चर्चेतही त्यांनी याचे सुतोवाच केले होते. “काही अवधीपर्यंत राजकारणात प्रत्यक्ष चालू राजकारणात आपण भाग घेणार नाही. कारागृहातही राजकारणात प्रत्यक्ष भाग घेता येतच नाही. परंतु, बाहेर राजकारणाव्यतिरिक्त शैक्षणिक, धार्मिक, वाङ्मयात्मक अशा अनेक प्रकारांनी तरी राष्ट्राची सेवा करता येईल. लढाईत पकडलेले सेनापती, युद्ध चालू आहे तोवर प्रत्यक्ष रणात उतरू नये. ‘धरीन मी शस्त्रा कदनसमयीं या निजकरीअशी यदुकूलवीराप्रमाणेच प्रतिज्ञा करवून घेतल्यावर त्या अभिवचनावर (on Parole) सोडण्यात येतच असतात आणि त्या यदुकूलवीराप्रमाणेच ते राजनीतिज्ञ सेनानी प्रत्यक्ष शस्त्रसंन्यास तेवढा करावा लागला तरी, राष्ट्रकार्यात त्याचे सारथ्य तरी करता यावे म्हणून अशी अट मान्य करण्यात काही एक कमीपणा मानीत नाहीत, तर उलट तसे करणे हेच तत्कालीन कर्तव्य समजतात.” (माझी जन्मठेप, पृष्ठ १६२) यानुसार, सावरकरांनी कारावासातील मुक्ततेनंतर अटीनुसार राजकारणाव्यतिरिक्त समाजसुधारणा, शुद्धी, विज्ञाननिष्ठता, भाषाशुद्धी, लिपीसुधारणा अशा प्रकारे प्रचंड राष्ट्रसेवा केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, प्रबोधन ठाकरे, सत्यशोधक भाई बागल, महात्मा गांधी या अशा अनेक समकालिन विविध नेत्यांनी सावरकरांच्या रत्नागिरीतील समाजसुधारणेच्या महान कार्याचे कौतुक केले होते. समाजसेवा ही एकप्रकारची राष्ट्रसेवाच आहे. ब्रिटिशविरोधी नसला तरी, हाही एक समाजस्वातंत्र्यलढाच आहे. राजकीय क्रांतिकारक सावरकर, कृतिशूर समाजक्रांतिकारकही होते. जे जे राजबंदिवान अंदमानातून सुटले, त्यातील बहुतांशजणांनी अशाच प्रकारच्या करारपत्रावर स्वाक्षऱ्या करून सुटका करून घेतली होती. उदा. “मी यावर पुन्हा कधीही किंवा अमुक वर्षे राजकारणात आणि राज्यक्रांतीत भाग घेणार नाही. पुन्हा मजवर राजद्रोहाचा आरोप सिद्ध झाला, तर मी ही माझी मागची उरलेली जन्मठेपही भरीन!” (माझी जन्मठेप, पृष्ठ ३०९) “इतर वाटेल ती भविष्यकालीन आणि राष्ट्रीय हितानुकूल अट मानावी म्हणून सगळ्यांस सांगत राहिलो. अशा प्रसंगात तशी अट लिहून देणे हेच राष्ट्रीय हितास एकंदरीत अनुकूल होते, हे मी शिवाजी-जयसिंग, शिवाजी-अफझुल, चमकोरनंतरच्या पलायनातील श्रीगुरूगोविंद आणि स्वत: श्रीकृष्ण यांच्या आणि अन्य उदाहरणांनी सर्वांच्या मनावर ठसवीत होतो. जे मानधनहट्टी होते, त्यांस अर्थातच हे पटेना. इतके हाल सोसूनही ज्यांचा बाणा तिळमात्र नरम झाला नव्हता, असे ते वीर माझा विरोध करताना पाहून मला आपल्या देशाच्या भविष्यकालाविषयी अधिकच आशा वाटू लागे. परंतु, अंती त्यांस तसेच करणे योग्य आहे हे राजनीतीचे धोरण मी पटवू शकलो आणि राजबंदींच्या सुटकेच्या वेळी सर्वांनी त्या करारपत्रावर डोळे मिटून सह्या करून कारागाराचे कुलूप एकदाचे तोडले.” (माझी जन्मठेप, पृष्ठ ४०१) म्हणजे सावरकरांचा ब्रिटिशांना आवेदने पाठवण्यामागचा त्यांचा हेतू, भूमिका किंवा धोरण काय आहे हे ते इतर सहबंदिवानांनाही स्पष्टपणे सांगत होते. तसेच त्यांनाही काहीही करून अंदमानातून बाहेर पडावे असेच सुचवत होते. म्हणजे, स्वत:ला सुचलेली सुटकेची चाणाक्ष कल्पना स्वत: पुरतीच मर्यादित ठेवण्याचा स्वार्थीपणा करता इतरांना सांगत होते. पटल्यास बिनतोड युक्तिवादाने इतिहासातील दाखले देऊन पटवून देत होते.
 
 

अलिपूर बॉम्ब खटल्यातील आरोपी हेमचंद्र दास आणि बारिंद्र कुमार घोष हे १९०८ साली अंदमानात आले सन १९२० मध्ये ब्रिटिशांनी त्यांना क्षमा करून सोडून दिले. लाहोर कटातील आरोपी सचिंद्रनाथ सन्याल यांनी सावरकरांप्रमाणेचआम्हाला उघड उघड राष्ट्रहितैषी चळवळ करायला मोकळीक दिली, तर आम्ही गुप्त क्रांतिकारक चळवळीचा मार्ग काय म्हणून स्वीकारू?” असे सरकारला आवेदन केले होते. ‘बंदिजीवनहे त्यांचे आत्मचरित्र. त्यांची सुटका झाली, पण सावरकरांची नाही. सुरेंद्रनाथांचे जावई विजयचंद्र चटर्जी हे बॅरिस्टर होते विरेंद्रनाथ चट्टोपाध्याय यांचे मित्रही होते. सचिंद्रनाथ विजयचंद्र यांना भेटायला गेले तेव्हा म्हणाले, ”विनायक दामोदर सावरकरने भी तो अपनी चिठ्ठी मे ऐसीही भावना प्रकट की थी, जैसेकी मैने की है। तो फिर सावरकर को क्यों नही छोडा गया और मुझको क्यों छोडा गया? यदि आपकी बात सत्य होती, तो सावरकरको भी छोडना चाहीए था।” (जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ ५३३) यावरून सरकारच्या मनात सावरकरांविषयी किती अविश्वास होता ते दिसते. अंदमानातून आपल्यासह राजबंदिवानांची सुटका व्हावी, यासाठी सावरकरांनी दोन प्रकारे प्रयत्न केले. एक मार्ग म्हणजे स्वत:सह राजबंदिवानांच्या मुक्ततेसाठी ब्रिटिशांना आवेदने धाडण्याचा. त्यासोबत भारतात ब्रिटिश सरकारवर दबाव आणण्यासाठी सावरकरांसह राजकीय बंदिवानांच्या मुक्ततेसाठी ठिकठिकाणी प्रांतिक परिषदा आयोजित करून सहस्रावधी स्वाक्षर्यांची आवेदने सरकारला धाडणे. यात सावरकरांचे धाकटे बंधू नारायणरावांचा सिंहाचा वाटा होता. सावरकरांनी बंधू नारायणरावांना पाठवलेल्या पत्रात या सुटकेसाठीचीस्वाक्षरी मोहीमकाढण्यास सांगितले होते, तर दुसरा मार्ग म्हणजे त्यांच्या क्रांतिकारक मित्रांनी त्यांची मुक्तता करण्यासाठी जर्मनीचे साहाय्य घेतले होते. परिणामी, जर्मनीचीएम्डेनयुद्धनौका अंदमानच्या आसपास फेऱ्या मारू लागली. अंदमानात सावरकरांना भेटून गेलेल्या सर रेजिनाल्ड क्रॅडॉकच्या नोंदीतही याचे सुतोवाच जाणवतात. भारतातून परत जातानामहाराजाबोटीवर २३ नोव्हेंबर, १९१३ ला सावरकरांच्या आवेदनावर क्रॅडॉकनी प्रतिवृत्त लिहिले. त्यात ते म्हणतात, ”सावरकरांचे हे एक दयेचे आवेदन आहे. त्यांना इथे काही स्वातंत्र्य देणे अगदी अशक्य आहे. मला असेही वाटते की, ते हिंदुस्थानातील कोणत्याही कारावासातून निसटून जातील... ते असे महत्त्वाचे पुढारी आहेत की, हिंदी अराजकवाद्यांचा युरोपियन विभाग त्यांच्या सुटकेसाठी कट करील नि तो कट त्वरेने रचला जाईल. त्यांना अंदमानातही सेल्युलर जेलच्या बाहेर जाऊ देण्यात आले, तर ते निसटून जातील, हे अगदी निश्चित आहे. त्यांचे मित्र याच बेटावर दबा धरून बसण्यासाठी एखादी बाष्पनौका सहज भाड्याने मिळवू शकतील आणि स्थानिक लोकांमध्ये थोडेसे पैसे वाटले की, बाकीचे कार्य पार पडेल.”

 

(जोशी वि. श्री., क्रांतिकल्लोळ, मनोरमा प्रकाशन, १९८५, पृष्ठ ५१३-५१४)

(क्रमश:)

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
 
@@AUTHORINFO_V1@@