नवी दिल्ली : देशभरातील ५० कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याच्या गेल्या दोन दिवसापासून बातम्या रंगत होत्या. मात्र आता यावर 'युनिक आयडेंटिफिकेशन ऍथॉरिटी ऑफ इंडिया'अर्थात युआयडीएआयने स्पष्टीकरण दिले आहे. ५० कोटी मोबाईल क्रमांक बंद होणार असल्याच्या बातम्या या काल्पनिक असून यामध्ये काहीही तथ्य नसल्याचे युआयडीएआयने सांगितले.
सिमकार्ड धारकांना कंपन्यांनी केवायसी बंधनकारक केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाने काही दिवसापूर्वीच सिमकार्ड पडताळणीसाठी खासगी कंपन्या ग्राहकांकडे आधार मागू शकत नाहीत, असा निर्णय दिला होता.
सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही देशातील ५० कोटी सिमकार्ड धारकांची केवायसी न झाल्याने हे सिमकार्ड बंद होणार असल्याची बातमी पसरवली जात होती. या बातमीचे गांभीर्य ओळखून युआयडीएआयने यावर स्पष्टीकरण दिले. त्यामुळे ही बातमी अफवा असल्याचे उघड झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/