नवी दिल्ली : तेल रिफायनरी आणि मोबाईल क्षेत्रातील प्रमुख कंपनी ‘रिलायन्स’ समुहाने दुसऱ्या तिमाहीत १७.३५ टक्के नफा नोंदवला आहे. चालु वित्तीय वर्षात दुसऱ्या तिमाहीत कंपनीला ९ हजार ५१६ कोटींचा नफा झाला. ‘रिलायन्स’ उद्योग समुहाच्या इतिहासातील तिमाहीतील हा सर्वाधिक नफा आहे. गेल्या वर्षी ८ हजार १०९ कोटी इतका नफा झाला होता. सप्टेंबर महिन्यातील तिमाहीपर्यंत दरवर्षी ५४.५ टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.
नफ्यातील ४४.५ टक्के वाटा हा पेट्रोकेमिकल्स आणि रिफायनरी उत्पादनांतून झाला आहे. रिफायनरी आणि पेट्रोकेमिल क्षेत्रात नव्याने उपलब्ध झालेल्या तंत्रज्ञानाचा कंपनीला फायदा झाल्याचे यात म्हटले आहे. “रिलायन्स समुह प्रत्येक तिमाहीत मजबूत होत असून कंपनीच्या नफ्यात वाढ होत आहे. कमोडिटी बाजारात येणाऱ्या अस्थिरतेतही आम्ही तग धरू शकलो आहोत.”, असे ‘रिलायन्स’ समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी म्हणाले. ‘जिओ’ येत्या काळात कायमस्वरुपी ब्रॉडबॅण्ड सेवा सुरू करण्यावर भर देणार आहे. टेलिकॉम कंपनी ‘जिओ’ने सुमारे ९ हजार २४० कोटींचा महसुल जमा केला आहे. गेल्या तिमाहीत तो ८ हजार १०९ इतका होता. ‘जिओ’ला या तिमाहीत ६१८ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या तिमाहीत हा नफा ६१२ कोटी इतका होता.
‘हॅथ’वे आणि ‘डेन’मध्ये गुंतवणूक
‘रिलायन्स’ समूह ‘हॅथ’वे आणि ‘डेन’ या केबल सेवा देणाऱ्या कंपनींशी करार करणार असल्याचे यावेळी जाहिर करण्यात आले. या अंतर्गत कंपनीला ‘जिओ’ गीगाफायबर ही नवी ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यास मदत होणार आहे. ‘हॅथवे’मध्ये ५१.३ टक्के आणि ‘डेन’ नेटवर्कमध्ये ६६ टक्के हिस्सा खरेदी करणार आहे. यासाठी ‘हॅथवे’मध्ये २९४० कोटी आणि ‘डेन’ नेटवर्कमध्ये २०४५ कोटी इतकी गुंतवणूक करणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/