वयाच्या अवघ्या १६ व्या वर्षी स्मिता पाटील यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केले होते. वृत्तनिवेदन करण्याचा त्यांचा अंदाजही निराळा होता. कार्यक्रम सुरू होण्याआधी त्या जीन्सवर झटपट साडी नेसायच्या. स्मिता यांचे वृत्तनिवेदन पाहून त्यांना दिग्ददर्शक श्याम बेनेगल यांनी चरणदास चोर या सिनेमात त्यांना संधी दिली.
स्मिता पाटील यांनी आपल्या १० वर्षांच्या करिअरमध्ये तब्बल ८० सिनेमात काम केले. ‘भूमिका’ आणि ‘चक्र’ या सिनेमांसाठी स्मिता यांना ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’ या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९८५ मध्ये त्यांना सिनेसृष्टीतील त्यांच्या योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. आज अभिनेत्री स्मिता पाटील आपल्यात नाहीत परंतु त्यांच्या नावाने आज अभिनेत्रींना ‘स्मिता पाटील पुरस्कार’ दिला जातो. अभिनयाबरोबरच त्यांना फोटोग्राफीचीही आवड होती. स्मिता एक उत्तम फोटोग्राफर होत्या.
‘नमक हलाल’ सिनेमातील अमिताभ व स्मिता यांचे ‘आज रपट जाए तो’ हे गाणे सुपरहिट ठरले. पण या गाण्याच्या चित्रिकरणानंतर स्मिता रात्रभर रडल्या होत्या. कारण या गाण्यात त्यांना अमिताभ यांच्या सोबत काही रोमँटिक सीन चित्रित करायचे होते. हे गाणे चित्रित करण्यास स्मिता आधी तयार नव्हत्या. अमिताभ यांनी समजवल्यानंतर स्मिता चित्रिकरणास तचयार झाल्या. पण असे सीन चित्रित करून आपण काहीतरी चूक करत आहेत असे वाटत असल्याने स्मिता यांना रडू कोसळले होते.
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांचे लग्न हे त्याकाळी संपूर्ण सिनेसृष्टीसाठी चर्चेचा विषय ठरले होते. कारण राज हे विवाहित होते. त्यामुळे स्मिता यांच्या घरातूनही त्यांच्या लग्नाला विरोध होता. पण अखेर राज यांनी आपले राहते घर सोडून स्मिता यांच्याशी दुसरा विवाह केला. मुलगा प्रतिक बब्बरच्या जन्मानंतर काही दिवसांनंतर स्मिता पाटील कालवश झाल्या. वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी स्मिता यांचा मृत्यु झाला. स्मिता यांची सिनेसृष्टीतील कारकिर्द ही जरी १० वर्षांची असली, तरी त्यांच्या अभिनयाची छाप आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/