भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर लवकरच होणार रेल्वेचा चौथा बोगदा
भुसावळ, १५ ऑक्टोबर
भुसावळ शहरातील बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेचे तीन बोगदे असून, भविष्यातील शहर व वाहतूक नियोजनाचा विचार करता येथे अजून एक चौथा बोगदा बांधण्याचे प्रयत्न आ. संजय सावकारे यांनी सुरू केले आहेत. या अनुषंगाने सोमवारी त्यांच्या निवासस्थानी शहरातील विकासकामांबाबत महत्त्वाची बैठक झाली.
बैठकीत नगरपालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुडकर, रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी एम.एस.तोमर, ‘तरुण भारत’चे भुसावळ विभागीय सल्लागार समकित सुराणा, न.पा.चे पंकज पन्हाळे उपस्थित होते.
शहरात विविधठकाणी विकासाच्या माध्यमातून होणार असलेल्या बदलांवर चर्चा करण्यात आली. १ ऑक्टोबर रोजी राज्याचे अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा जळगाव दौरा होता. या दौर्यात ‘तरूण भारत’ भुसावळ विभागीय नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ना. सुधीर मुनगंटीवार आले असता, आमदार संजय सावकारे यांनी शहरातील विकासकामांबात ना. मुनगंटीवार यांना माहिती दिली. नगरविकास खात्याकडून या कामांना मंजुरी देण्याचे आश्वासन ना. मुनगंटीवार यांनी दिले होते. विभागात ‘अ’ वर्ग असलेल्या भुसावळ नगरपालिकेला यावल रोडवरील सेंट अलायसेस शाळेजवळची रेल्वेची दीड लाख स्क्वेअर फुट जागा नवीन इमारतीसाठी देण्यात येणार आहे. तसेच बाजूलाच रेल्वे जीआरपी पोलिस कर्मचार्यांची वसाहत बांधण्यात येणार आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्यासमोर रेल्वेच्या चौथ्या बोगद्याच्या कामाला लवकरच सुरुवात होणार आहे. बोगद्याजवळील व्यावसायिकांची लवकरच बैठक घेण्यात येऊन त्यांना सहकार्याचे आवाहन केले जाणार आहे. या नवीन बोगद्यामुळे व्यावसायिकांची दुकाने तुटणार आहेत.
बाजारपेठ ते बसस्टॅण्ड २४ मीटरचा रस्ता होणार
शहरातील बाजारपेठ पोलीस ठाणे ते बस स्टॅण्ड रस्ता हा २४ मीटरचा होणार आहे. पुरातन हनुमान मंदिराचाही जीर्णोध्दार होणार असून, रेल्वेची भिंत तोडून रस्ता मोठा होणार आहे. पहिल्या टप्प्यात बाजारपेठ ते अमर स्टोअर्स आणि नंतर बसस्टॅण्ड, असा रस्ता तयार होणार आहे.
रेल्वे गार्डलाईन मार्ग वरणगाव रस्त्याला जोडणार
बसस्टॅण्ड जवळील रेल्वे गार्डलाईन मार्ग २४ मीटरचा होणार असल्याने येथील रेल्वे कर्मचार्यांची घरे तोडून या ठिकाणी नवीन मोठा मार्ग थेट वरणगाव रोडवर असलेल्या एबीसी शाळेजवळ जोडण्यात येणार आहे. शहरातल बेशिस्त पार्किंगला आळा बसण्यासाठी ‘टू ऍण्ड लिफ्ट’द्वारे रस्त्यात पार्किंग केलेल्या बेशिस्त वाहनांना उचलून रस्ते मोकळा श्वास घेतील, असे नियोजन करण्यात आले आहे.