हज यात्रेतील भारताच्या कोट्यात देखील वाढ
नवी दिल्ली : १९९५ मध्ये थांबवण्यात आलेल्या सागरी हज यात्रेला सौदी अरेबिया सरकारने मान्यता दिली असून लवकरच भारतामधून पुन्हा एकदा सागरी मार्गाने हज यात्रा सुरु करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी दिली आहे. नुकताच या संबंधी सौदी अरेबिया आणि भारत सरकार यांच्यात चर्चा झाली असून सागरी मार्गे हज यात्रेसाठी आवश्यक गोष्टींसाठी दोन्ही पक्षांकडून प्रयत्न सुरु करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
अरबचे हज मंत्री डॉ. मोहम्मद सालेह बिन ताहिर बेंटन आणि सौदीचे राजे सलमान बिन अब्दुल अजीज अल सऊद यांची नक्वी यांनी भेट घेऊन नुकतीच याविषयी चर्चा केली आहे. या चर्चमध्ये भारतातून पूर्वी सागरीमार्गे होत असलेल्या हज यात्रेला पुन्हा एकदा सुरु करण्यासंबंधी आणि भारताचा हज यात्रेतील कोटा वाढवण्यासंबंधी चर्चा झाली. या चर्चेनंतर सौदी अरेबियाकडून भारताच्या या दोन्ही मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद मिळावा, सौदीने सागरी यात्रेला परवानगी देत भारताच्या कोट्यात देखील वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या चर्चेनंतर देशांमध्ये या संबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या देखील करण्यात आल्या आहेत.
या नव्या निर्णयानुसार भारताचा हज यात्रेतील कोटा वाढवून तो १ लाख ७५ हजार २५ इतका करण्यात आला आहे. त्यामुळे यंदा 'मेहरम' शिवाय हज यात्रेला जाण्यासाठी नावनोंदणी केलेल्या सर्व १३०० मुस्लीम महिलांना भारत सरकारकडून हज यात्रेला पाठवण्यात येणार आहे, असे नक्वी यांनी सांगितले आहे. तसेच सागरी प्रवासामुळे भारत सरकारच्या खर्चात देखील बचत होणार असून नव्या जहाजांच्या माध्यमातून मुंबईहून हजला अवघ्या चार दिवसांमध्येच जाता येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.