कर्नाटक : कर्नाटक येथे गरीबांसाठी देण्यात आलेल्या पैसा देखील काँग्रेसने हडपला, अशा कठोर शब्दात भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी काँग्रेसला टोला लगावला. कर्नाटक येथे भारतीय जनता पक्षाच्या परिवर्तन रॅलीला संबोधित करताना ते आज बोलत होते.
"कर्नाटकच्या जनतेचा विकास काँग्रेसमुळे थांबला. मी विचारतो जनतेसाठी देण्यात आलेला पैसा कुठे गेला? तो जनतेपर्यंत का पोहोचला नाही? त्याचे उत्तर जाणून घ्यायचे असेल तर कर्नाटक येथील काँग्रेस नेत्यांचे पाच वर्ष पूर्वीची घरे बघा आणि आताची घरे बघा, तुम्हाला उत्तर आपोआप मिळेल." असे देखील ते यावेळी म्हणाले.
सिद्धारामैय्यांचे सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे :
सिद्धारामैय्या यांचे सरकार मतपेटीचे राजकारण करत आहे. त्यांचे सरकार हिंदु विरोधी सरकार आहे. जातीचे राजकारण करुन लोकांना भडकविण्याचा ते प्रयत्न करत आहेत. असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
एकाबाजूला काँग्रेसच्या नेत्यांनी जनतेचा पैसा तुबाडला तर दुसऱ्या बाजूला मोदी सरकारने ३.३३ लाख गरीब महिलांना मोफत एल.पी.जी. गॅस कनेक्शन दिले. मोदी सरकारने कर्नाटकला ८८,५८३ कोटी रुपयांपासून २ लाख १९५०० कोटी रुपयांपर्यंत पोहोचविले, असेही ते यावेळी म्हणाले.