मुंबई : राज्य सरकारी कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे. महागाई भत्ता ९ टक्क्यांहून १२ टक्के करण्यात आल्याची माहिती वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी झालेल्या मंत्रीमंडळाच्या निर्णयाद्वारे दिली.
वित्त विभागाने यासंबंधीचा शासननिर्णय आज निर्गमित केल्याचे सांगून ते म्हणाले, “१ जानेवारी २०१९ पासून ७ व्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनसंरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात ही वाढ करण्यात आली आहे. ही वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात येईल. १ जानेवारी ते ३० जून २०१९ या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्रपणे आदेश निर्गमित केले जातील असेही ते म्हणाले.
राज्य सरकारतर्फे जारी करण्यात आलेल्या पत्रकानुसार, १ जानेवारी २०१९पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मुळ वेतनावरील महागाई भत्ता नऊ टक्क्यांवरून १२ टक्के करण्यात यावा, तसेच महागाई भत्त्याची वाढ १ जुलै २०१९ पासून रोखीने देण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी केली होती.
जानेवारी २०१९ ३० जून २०१९ या सहा महिन्यांच्या कालावधीतील थकबाकीबाबत स्वतंत्र आदेश दिले जातील, असे राज्य सरकारतर्फे सांगण्यात आले आहे. महागाई भत्याची रक्कम प्रदान करण्यासंदर्भातील विद्यमान तरतुदी व कार्यपद्धती आहे. त्याचप्रमाणे यापुढे लागू राहणार आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat