मुंबई : वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना देण्यात येणाऱ्या मदतीत वाढ करण्याचा विचार असल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. विधानसभेत मंगळवारी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना मुनगंटीवार यांनी माहिती दिली.
वडेट्टीवार यांच्या लक्षवेधीला उत्तर देताना वनमंत्री म्हणाले, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पूर्वी दोन लाख रुपयांची मदत दिली जात होती. ती पाच लाख करण्यात आली. २०१४ मध्ये ती रक्कम १५ लाख एवढी करण्यात आली. यापैकी तीन लाख रुपये धनादेशाद्वारे दिले जातात. भविष्यकाळात त्या कुटुंबाचा उपजीविकेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी, १२ लाख रुपये अनामत म्हणून बँकेत ठेवले जातात. या मदतीच्या रकमेत वाढ करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे.
वन्य प्राण्यांद्वारे शेतकऱ्यांचे शेतीचे नुकसान केले जाते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी याकरिता समिती नेमण्यात आली असून शेतकऱ्यांना १५ दिवसात भरपाई मिळावी यासाठी या समितीच्या माध्यमातून कायदा करण्यात येत असल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat