म. रा. जोशी यांना राज्य शासनाचा 'ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार' जाहीर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jul-2019
Total Views |




मुंबई : राज्य शासनाच्यावतीने संत साहित्यासाठी तसेच मानवतावादी कार्यासाठी दिला जाणारा सन २०१८-१९ चा ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कारसंत साहित्याचे अभ्यासक म.रा.जोशी यांना जाहीर करण्यात आला आहे. रुपये ५ लाख रोख, मानपत्र आणि मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरुप असून, आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी या पुरस्काराची घोषणा केली.

 

मधुकर जोशी हे संत साहित्यामधील ज्येष्ठ लेखक असून या विषयावर ते लेखन करीत आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे प्राध्यापक म्हणून नागपूर विद्यापीठातून ते सेवानिवृत्त झाले आहेत. नागपूर विद्यापीठामध्ये मराठी साहित्याच्या ज्ञानकोषाचे ते संपादक आहेत. तुकाराम महाराजांच्या एक हजार पृष्ठांच्या गाथेचे त्यांनी संपादन केले आहे. प्राचीन मराठी संत वाड.मय आणि साहित्य हा त्यांच्या अभ्यासाचा विषय आहे. पीएच.डी आणि एम.फिलचे परीक्षक म्हणून त्यांनी काम केलेले आहे. मराठी बोर्ड ऑफ स्टडी जबलपूर, नागपूर आणि उज्जैन अभ्यास मंडळावर त्यांनी सदस्य म्हणूनही काम पाहिले आहे. अनेक विद्यापीठांमध्ये त्यांना संत साहित्याच्या विषयावर अतिथी प्राध्यापक म्हणून निमंत्रित करण्यात येते.

 

जोशी संत साहित्य विषयाचे पीएचडी चे मार्गदर्शक आहेत. त्यांचे २०० हून अधिक लेख एनसायक्लोपीडिया ऑफ हिंदुइजमकडून प्रकाशित करण्यात आले आहेत. सार्थ तुकाराम गाथेची ४०० हस्तलिखिते तपासून प्रसिद्ध केली आहेत. नाथ सांप्रदाय, ज्ञानेश्वरी संशोधन, गुलाबराव महाराज समकालीन साहित्य, दत्त गुरुचे दोन अवतार, मनोहर आम्बानगरी, श्री विठ्ठल आणि पंढरपूर, समग्र समर्थ रामदास स्वामी साहित्य अशी त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. सध्या ते तंजावर येथील ३५०० मराठी हस्तलिखितांचे संशोधन करत आहेत. मधुकर रामदास जोशी यांना हा पुरस्कार लवकरच प्रदान करण्यात येणार असल्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज येथे सांगितले.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

@@AUTHORINFO_V1@@