चिपळूण : रत्नागिरीतील तिवरे दुर्घटनाग्रस्तांसाठी तात्काळ पंतप्रधान आर्थिक साहाय्यता निधीतून मदत जाहीर करावी, अशी मागणी खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे. मंगळवार, दि. ९ जुलै रोजी पंतप्रधानांची भेट घेत त्यांनी ही मागणी केली आहे. यावेळी खासदार खासदार संजय मंडलिकही उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे चिपळूण तालुक्यातील तिवरे येथील धरण फुटल्याची घटना २ जुलै रोजी मध्यरात्री घडली. त्यात एक वाडी वाहून काही लोक बेपत्ता झाले, तर त्यापैकी १९ जणांचे मृतदेह सापडले.
दरम्यान, राज्य सरकारतर्फे मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणी तातडीने प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून मदत कार्याबाबत सूचना दिल्या होत्या. जिल्हा प्रशासन आणि राष्ट्रीय आपत्तीनिवारण दलाकडूनही मदत सुरू होती. या दुर्घटनेची चौकशी करुन पुढील कार्यवाही करण्याचे स्पष्टीकरण राज्य सरकारतर्फे देण्यात आले आहे.
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat